भाजपामध्ये अंतर्गत धुसफूस सुरु असून, पक्षाचे ज्येष्ठ नेते शांता कुमार यांच्या पत्रामुळे ही धुसफूस पुन्हा एकदा चव्हाटयावर आली आहे.
पक्षाध्यक्ष अमित शहा यांना पाठवलेल्या पत्रामध्ये शांता कुमार यांनी व्यापम घोटाळा, ललित मोदी प्रकरण आणि चिक्की घोटाळयाच्या आरोपांमुळे भाजपाची मान शरमेने खाली गेल्याचे नमूद करुन पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
त्यांच्या या पत्रावर प्रतिक्रिया व्यक्त करताना वरिष्ठ भाजपा नेते राजीव प्रताप रुड्डी म्हणाले की, शांता कुमार पक्षाचे जबाबदार नेते आहेत त्यांच्यावर चुकीच्या प्रचाराचा प्रभाव पडला आहे. आम्ही त्यांची मागणी फेटाळून लावतो.
शांता कुमार यांनी भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणे हाताळण्यासाठी पक्षामध्ये अंतर्गत लोकपाल नियुक्त करण्याची मागणी केली आहे.हिमाचलप्रदेशमधून येणारे ८० वर्षीय शांताकुमार यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. त्यांनी पक्षामध्ये नैतिकता समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. या समितीकडे लोकपाल सारखे अधिकार असले पाहिजेत असे त्यांनी म्हटले आहे.
मी पत्र लिहीले असून, पत्रातल्या प्रत्येक शब्दावर मी कायम आहे. आमच्या पक्षाने गौरवशाली कामगिरी केली आहे. आमच्या पक्षाने निवडणुकीत मोठा विजय मिळवला. सरकार स्थापन केले आणि वर्षभर व्यवस्थित सरकार चालवले. आता काही डाग लागले आहेत आणि त्यामुळे वेदना होत आहेत. मी माझे मत आणि वेदना पक्षाध्यक्षांना कळवल्या आहेत असे शांता कुमार यांनी सांगितले. १० जुलैच्या तारखेनिशी हिंदी भाषेमध्ये लिहीलेले हे दोन पानी पत्र त्यांनी पक्षाध्यक्षांना पाठवले आहे.