इंटरनेट फुकट वाटता, मग रेशन, पेट्रोल-डिझेल, दूध-फळे सगळेच ५० वर्षांचा करार करून मोफत द्या. आहे का हिंमत, असा सवाल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
मुंबई- जिओ फायबरमुळे अस्वस्थ झालेल्या केबलचालकांना दिलासा देण्यासाठी केबल मालकांच्या संघटनेने बोलावलेल्या सभेत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रिलायन्सवर जोरदार टीका केली.
केबल चालकांनी कष्ट करून व्यवसाय उभे केले. ते असे उद्ध्वस्त होऊ देणार नाही. इंटरनेट फुकट वाटता, मग रेशनही फुकट वाटा. डिजीटल इंडियात केबल फुकट मिळत असेल तर मग पेट्रोल-डिझेल, दूध-फळे सगळेच मोफत द्या. आणि ५० वर्षांचा करार करून मोफत सेवा वाटा. आहे का हिंमत, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
मुंबईतील रंगशारदा सभागृहात आज केबल सेनेचा मेळावा झाला. यावेळी रिलायन्स जिओमुळे केबल व्यावसाय़िकांसमोर अनेक समस्या उभ्या राहिल्या असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी लोकांच्या ताटातली भाजी-भाकरी काढून घेतल्यावर डिजिटलने पोट कसे भरेल. कोणाला व्यवसाय करण्यास आमचा विरोधा नाही. आणखी १० जणांनी यावे पण कोणाच्या पोटावर पाय आणू नये, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
इंटरनेट सारख्या सेवा आधी फुकट वाटतात आणि काही महिन्यांत प्रतिस्पर्धी नामोहरम होऊन संपले की नंतर अव्वाच्या सव्वा दर वाढवतात, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच आपण येथे भाषण द्यायला आलो नसून केबल मालकांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहणार असल्याचे सांगायला आलो असल्याचे आश्वासन उद्धव यांनी दिले.
देशात सध्या सगळीकडे डिजिटलचा नारा दिला जात आहे. पण रोजी रोटी डाउनलोड करता येत नाही. घरात रोजी रोटी नाही आणि डिजिटल इंडिया कसला करताय, असा सवाल त्यांनी यावेळी भाजप सरकारला विचारला. गेल्या वेळेस सेट टॉप बॉक्स केबल चालकांच्या पोटावर पाय द्यायला निघाले होते. आता जिओ. दोन्ही वेळेला भाजप सरकारच आहे, अशी टिकाही त्यांनी केली. जिओ सर्व फुकट देणार असेल तर मोदींनी त्यांच्याकडून शिकायला पाहिजे. पण फुकटात देने ही एक लालूच आहे. म्हणूनच या लढाईत शिवसेना केबल चालकांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.