नेरळमध्ये मुसळधार पावसामुळे भातशेतीचं नुकसान झाल आहे. त्यामुळे कृषी विभाग आणि महसूल विभागाने नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेतले आहे.
नेरळ – मागील आठवडाभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील बळीराजा संकटात आहे. दरम्यान, कृषी विभाग आणि महसूल विभागाने नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेतले आहे.
हस्त नक्षत्राच्या या पावसाने शेतक-यांची त्रेधा उडवली आहे. मुसळधार पावसासोबत सोसाट्याच्या वा-यामुळे उभी पिके आडवी झाली आहेत. शेतात पाणी असल्याने पिकाची कापणी करून ठेवायचे कुठे, असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.
पहिल्या टप्प्यात वादळीवा-यामुळे वासरे भागात पिकाचे नुकसान झाले. वीट, सालपे, कोंदिवडे, मूळगाव, माणगाव, शिरसे आदी भागातील भाताचे पिके पाण्याखाली गेली आहेत. कळंब भागातील शेतक-यांनी पीक कापणीस सुरुवात केली होती, मात्र आठवडाभरापासून पडत असलेल्या पावसामुळे या शेतक-यांना कापलेले पीक पुन्हा सुकवण्यासाठी दुप्पट मेहनत करावी लागत आहे. पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास पीक शेतातच कुजण्याची शक्यता असल्याने बळीराजा चिंताक्रांत आहे. दरम्यान, कृषी आणि महसूल विभागाने नुकसानग्रस्त शेतक-यांच्या शेताचे सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे.