उल्हासनगर येथील रहदारीच्या रस्त्यांखाली असलेल्या मलनिस्सारण वाहिनीवरची झाकणे खचली आहेत.
उल्हासनगर महापालिकेची भुयारी मलनिस्सारण व्यवस्था जीर्ण झाली आहे. काही ठिकाणी वाहिन्या कच-याने भरल्याने वापरातही नाहीत. या मलनिस्सारण वाहिनी दुर्लक्षित असल्याने रस्त्याच्या मध्यभागी असलेली त्यांची झाकणेही निखळून तुटली आहेत. या झाकणांवरून अवजड वाहने जाऊन, झाकणे खचल्यास मोठी दुर्घटना घडू शकते.
कॅम्प-४ येथील सुभाष टेकडी परिसरात वनिता दाभार्डे या वृद्ध महिलेचा पंध्रा दिवसांपूर्वी डेंग्यूने मृत्यू झाला आहे. सिद्धार्थ नगरमधील नागरिकांत उलटय़ा आणि तापाचीही साथ आली होती. येथीलच डिफेन्स किराणा दुकान परिसरातील भुयारी मलनिसारण वाहिनीही तुंबली आहे. या वाहिनीवरचे झाकणही तुटल्याने मलनिस्सारण वाहिनीतून किडे बाहेर पडत असल्याची तक्रार नागरिकांची आहे. ही मलनिस्सारण वाहिनी तात्काळ दुरुस्त करण्याची तसेच नवीन झाकण बसवण्याची लेखी मागणी स्वाभिमान संघटनेचे उल्हासनगर संपर्कप्रमुख प्रशांत चंदनशिवे यांनी प्रभाग समिती-४च्या आरोग्य दक्षता अधिका-यांकडे केली आहे.