नव्याने उद्योगात येणा-या उद्योजकांच्या समस्यांचे निवारण करून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी ‘उद्योजक साम्राज्य’द्वारे आयोजित ‘उद्योजक साम्राज्य चळवळी’ला नव उद्योजकांनी नवे बळ देत उदंड प्रतिसाद दिला.
रविवार २२ नोव्हेंबर रोजी कांदिवली पश्चिम येथील सौजन्य पार्क परिसरात आयोजित कार्यक्रमात अनेक उद्योजकांनी आपल्या भाषणातून उद्योग क्षेत्रात येऊ इच्छिणा-या नवउद्योजकांना मार्गदर्शन केले.
‘उद्योजक साम्राज्य चळवळी’च्या या कार्यक्रमाला शेकडो उद्योजकांनी हजेरी लावली होती. सचिन मांजरेकर यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना केली. तर ‘ध्येय’ या उद्योग विषयक कविताचे वाचन या कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी पूर्णिमा शिरीषकर यांनी महिला उद्योजकांना मार्गदर्शन केले.
‘घरात परिपूर्णपणे व्यवस्थापन केल्यास आपण आपल्या व्यवसायाला वेळ देणे सोपे होते. नोकरी व व्यवसायातील फरक जाणून घेणे गरजेचे आहे. सोशल मिडियाचा, नवतंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसाय वाढवला पाहिजे. प्रत्येक महिलेच्या अंगा कला असते. या कलेला उद्योगात आणल्यास प्रत्येक महिला ही ‘उद्योगिनी’ होऊन आर्थिकदृष्टया सक्षम होऊ शकते. व्यवसाय करू इच्छिणा-या प्रत्येक घरातील महिलेसाठी ‘झेप उद्योगिनींची’ हे व्यासपीठ उपलब्ध आहे.
प्रत्येक घरातील महिला उद्योगिनी व्हावी, हे ‘झेप’चे ध्येय आहे.’ असे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. या कार्यक्रमाला महिलांची लक्षणीय उपस्थिती पाहून नगरसेविका निलम ढवन यांनी आनंद व्यक्त केला. मीरा-भाईंदर परिसरातील व्यवसाय करू इच्छिणा-या महिलांसाठी मदतीचा हात पुढे केला.
आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्या व्यवसायातील सुरुवातीच्या प्रवासाची यावेळी विशेष आठवण करून दिली. वडापाव विकणारा देखील उद्योजक आहे व त्याचे महत्त्व पटवून दिले. विनोद मेस्त्री व नामदेवराव जाधव यांनी, ‘शिवाजी आणि व्यवस्थापन’ विषयावर उद्योजकांना मार्गदर्शन केले. यांच्यासह संजय यादव राव, भूमि सावंत, केतन गावण, अमी शेठ, बासू माळी, आनंद घुरगे, माधवराव भिडे, अमित बागवे, निलेश मोरे, सुधीर सिन्हा, विभूती कदम व आदी मान्यवरांनी यावेळी नव उद्योजकांना मार्गदर्शन केले.
उद्योजकांचा विकास मार्गदर्शन व माहिती, जाहिरातींचे नवीन तंत्रज्ञान, बिझनेस नेटवर्किंगमधून उद्योग निर्मिती, स्त्री उद्योजिका सक्षमीकरण, महिलांना उद्योगाचे पर्याय हे विषय या कार्यक्रमात हाताळण्यात आले. कार्यक्रमाचे संस्थापक आणि संचालक संजय लाड यांनी मिडीया पार्टनर दैनिक ‘प्रहार’चे आभार मानले.
प्रहारच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रत्येक उद्योजकापर्यंत पोहचला, व प्रहारमुळे कार्यक्रमाला उद्योजकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किमया आणि चैताली मोडक यांनी केले.