पटपडताळणीच्या निकषांवरून काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने १००पेक्षा अधिक शाळांची मान्यता रद्द केली. तरी आजही अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्राथमिक सुविधा उपलब्ध नाहीत.
नेरळ – पटपडताळणीच्या निकषांवरून काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने १००पेक्षा अधिक शाळांची मान्यता रद्द केली. तरी आजही अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्राथमिक सुविधा उपलब्ध नाहीत. आसल ग्रामपंचायत हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या आसलपाडा प्राथमिक शाळेतील कूपनलिका व नळांची गेल्या सात-आठ वर्षापासून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पाण्याअभावी शाळेतील विद्यार्थी तहानेने व्याकूळ झाले आहेत.
आसलपाडा प्राथमिक शाळा १९७० मध्ये सुरू करण्यात आली. पहिली ते इयत्ता चौथीपर्यंतच्या या शाळेत लहानग्यांच्या सोयीसुविधांकडे पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. पंचायत समितीकडून शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी कूपनलिका बसवण्यात आली होती. परंतु या कूपनलिकेची दुरवस्था झाल्यामुळे समितीच्या २००५पासून जमिनीतील पंपाद्वारे पाणी खेचले जात नाही. तसेच आसल ग्रामपंचायतीकडून बसवण्यात आलेल्या नळांचीही दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना पाणी पाणी करत राहावे लागते.
विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत समितीने लक्ष दिले पाहिजे. – सीमा जोंधळे, मुख्याध्यापिका,आसलपाडा प्राथमिक शाळा
आसलपाडा प्राथमिक शाळेतील पिण्याच्या पाण्याची सुविधा तातडीने उपलब्ध केली जाईल.- सुधाकर डंबाये, गटशिक्षण अधिकारी,पंचायत समिती,कर्जत.