दि. १५ ऑगस्ट १८७२ रोजी कलकत्ता येथे अरविंद कृष्णधवन घोष यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे वैद्यकीय उच्चशिक्षण परदेशात झाले होते. तिथल्या संस्कृतीची ओळख त्यांना होती, म्हणूनच आपली मुले दैववादी भारतीय संस्कृती व लोकजीवनापासून सदैव मुक्त राहावीत, यासाठी ते प्रयत्नशील होते. अरविंदांचे सारे शिक्षण विलायतेत झाले. इंग्रजी, ग्रीक आणि लॅटिन या भाषांबरोबरच अन्य युरोप भाषा व विचारशाखेत पारंगत होऊन आय. सी. एस. ची परीक्षा देऊनही, पदवी न घेताच सन १८९३ मध्ये ते स्वदेशी परतले. सन १८९३ ते सन १९०७ या काळात ते बडोद्याला सयाजीराव महाराजांचे सचिव व तेथील महाविद्यालयात फ्रेंचचे प्राध्यापक होते. या काळात त्यांचे देशकारण, वाचन, चिंतन, योगसाधना, सुरू होती. लोकमान्यांचे जहाल नेतृत्व मानणारे अरविंद बंगालमधील क्रांतिकारांचे पाठीराखे होते. काही काळ त्यांनी कारावासही भोगला. कारागृहात त्यांना अतिंद्रीय अनुभव आले. पुढे त्यांची त्या साधना सुरू झाली. माणिकतोळा खटल्यात बॉम्ब तयार करणारा हा क्रांतिकारक आता योगसाधना करणारा योगिराज होत होता. दि. ४ एप्रिल १९१० रोजी ते पाँडेचेरीस गेले. तेथेच त्यांना १९१४ मध्ये मीरा रिचर्ड ही फ्रेंच विदुषी भेटली. याच माताजी.