Home कोलाज अंधबधिर मुलांची शाळा उभारणारी माऊली

अंधबधिर मुलांची शाळा उभारणारी माऊली

0

‘आई’ म्हणजे केवळ दोन शब्द नव्हे तर संपूर्ण विश्व त्यामध्ये सामावलेले असते. आपल्या मुलांसाठी काहीही करायला नेहमी सज्ज राहणारी आई सर्वानाच ठाऊक आहे.

‘आई’ म्हणजे केवळ दोन शब्द नव्हे तर संपूर्ण विश्व त्यामध्ये सामावलेले असते. आपल्या मुलांसाठी काहीही करायला नेहमी सज्ज राहणारी आई सर्वानाच ठाऊक आहे. मात्र, अपर्णा आगाशे या सर्वसामान्य माऊलीने चक्क आपल्या कर्णबधिर मुलाला समाजात आत्मविश्वासाने वावरता यावे, तो स्वावलंबी व्हावा, यासाठी १९९२ साली स्वत: शाळा स्थापन केली. गेली १५ र्वष त्या डोंबिवली पश्चिम भागात ‘संवाद कर्णबधिर प्रबोधिनी’ ही विशेष शाळा चालवत आहेत.

लहान मुलगा अमेय आगाशे ‘अस्तित्व’ या शाळेत शिकत असताना तेथील अपंग मुलांच्या महिला पालकांनी एकत्र येऊन ‘संवाद कर्णबधिर प्रबोधिनी’ ही शाळा सुरू केली. केवळ सात महिलांनी एकजूट होऊन आपल्या मुलांसाठी एक लहानसे रोपटे लावले. मात्र, आता या रोपटय़ाचे मोठय़ा वृक्षात रूपांतर झाले आहे. सुरुवातीला अपर्णा आगाशे यांच्या लहान घरातून या शाळेची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी शाळेत पाच ते सहा मुलं असायची. परंतु त्यानंतर मुलांची संख्या वाढत गेल्याने बसण्यासाठी जागा अपुरी पडायला लागली.

घरात शाळा असल्याने शासनमान्यता मिळत नसल्याच्या कारणास्तव त्यांनी आरोग्यक्रेंद्र बिल्डिंग, काळुनगर, ठाकूर वाडी, डोंबिवली (प.) येथे एक जागा भाडेतत्त्वावर घेतली. सध्या या शाळेला सरकारमान्यता प्राप्त झालेली आहे. कर्णबधिर मुलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी या शाळेचे संचालक मंडळ व शिक्षकवर्ग प्रयत्नशील आहे. याशिवाय सध्या शाळेत एकूण ४५ मुलं आहेत. मुळात शाळेत प्रवेश घेण्यासाठी मुलं येत नाहीत. आगाशे आणि शाळेतील शिक्षक प्रत्येकाच्या घरी जाऊन अशा कर्णबधिर मुलांचे सर्वेक्षण करतात. त्यांना अशी मुलं आढळल्यास त्यांच्या पालकांची समजूत काढून त्यांना शाळेत प्रवेश देण्यात येतो. आता बहुतांश लोकांना या शाळेबाबत माहिती मिळालेली आहे. परंतु तरीही संचालक मंडळ विविध परिसरात जाऊन अशा मुलांचा शोध घेतात.

संवाद कर्णबधिर प्रबोधिनी या शाळेचे वैशिष्टय़ म्हणजे येथे आíथकदृष्टय़ा दुर्बल घटकातील मुलांना विशेष प्राधान्य देण्यात येते. कारण, अशा मुलांना शाळेत घालण्यासाठी त्यांच्या पालकांकडे पैसा नसतो. त्यामुळे ही मुलं शिक्षणापासून वंचित राहतात. या शाळेच्या माध्यमातून या गरजू मुलांसाठी एक विश्व मंडळाने तयार केले आहे. ही मुलं इतरांपेक्षा कमी नाहीत. त्यामुळे इतर शाळांमधील मुलांप्रमाणेच या मुलांना सुद्धा सर्व विषय शिकविण्यात येतात. शिशू गटातील मुलांना विशेष मार्गदर्शन, व्यवसायभिमुख शिक्षणाची पूर्वतयारी, मुलांच्या आरोग्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. सर्व प्रकारच्या अपंग मुलांना शासकीय योजनांची माहिती देण्यात येते.

शिशू वर्गापासून सातवी ते नववीपर्यंत मुलांना शिकविण्यात येते. त्यानंतर शाळाबाह्य मुलांना सतरा नंबरचा फॉर्म भरून दहावीच्या परीक्षेला बसविण्यात येते. या मुलांना लहानपणापासूनच संगणकाचे धडे गिरविण्यात येत आहेत. ठाणे, मुंबई, नाशिक, कल्याण परिसरातील होणा-या कला, क्रीडा बौद्धिक स्पर्धामध्ये राज्यस्तरीय नाटय़ स्पध्रेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकावली आहेत. कर्णबधिर विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व जडणघडण होण्यासाठी शाळेत कवायत स्पर्धा, भाषा आकलन स्पर्धा, स्मरणशक्ती स्पर्धा, अभ्यासपूर्ण सहली व भेटीचे आयोजन, क्रीडास्पर्धा या मुलांना सामाजिक जाणिवांची जाण होण्यासाठी रेल्वेस्थानक परिसर स्वच्छ करणे, रुग्णालयात जाऊन रक्षाबंधन करणे, सर्वधर्मीय सण- उत्सव साजरे करणे याकडे लक्ष दिले जाते. त्याचबरोबर हवाईदलाची माहिती देणे, हिवताप निर्मूलनासाठी परिसरातील साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे, अपंगांच्या हक्कासाठी व जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढण्यात येते. आजपर्यंत या शाळेचा एस.एस.सी. निकाल १०० टक्के लागला आहे. संवाद कर्णबधिर प्रबोधिनीतील इन्फंट सेंटरचा रत्नागिरी, डहाणू येथील कर्णबधिर मुलांनी लाभ घेतला आहे.

कर्णबधिर मुलांच्या शाळेतील शिक्षक हे विद्यार्थ्यांचे सहावे इंद्रिय म्हणून काम करीत असतात. त्यामुळे ही मुले प्रगती करतात. योग्य वयात योग्य असे श्रवणहासाचे निदान करून श्रवणयंत्र मिळवून देणे आवश्यक असते. योग्य श्रवणयंत्र न मिळाल्यास भाषा व ज्ञानापासून त्यांना वंचित राहावे लागते. म्हणून शाळा मुलांना योग्य ते श्रवणयंत्र मिळवून देण्याचा प्रयत्न करत असते. कर्णबधिर मुलांच्या विविध आíथक, शारीरिक इतर अडचणी सोडविण्याचा प्रयत्न शाळेत केला जातो. विद्यार्थ्यांना इतर दानशूर व्यक्तींकडून शालेय साहित्य, पोषक आहार मिळावा यासाठी विश्वस्त शिक्षण जागरूक असतात. त्यामुळे या शाळेला पुढे नेण्यासाठी प्रबोधिनीच्या संचालक मंडळ व शिक्षकांची अखंड धडपड सुरू असते. त्यामुळे एका लहानशा रोपटय़ाचे आता मोठय़ा वटवृक्षात रूपांतर झाले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version