नाशिक : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबई-नाशिक महामार्गावर अपघातांच्या (Mumbai-Nashik Highway Accident) दोन दुर्दैवी घटना घडल्या. या अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी (New Year 2024) पहाटे या घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
पहिली घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील इगतपुरी बायपास जवळील बोरटेंभे येथे सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. यात एका मर्सिडीज कारने भाजीपाला घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी तत्काळ नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
दुसरी घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील पाचपाखाडी भागात घडली. सोमवारी सकाळी टाटा सुमो ही गाडी ठाण्याच्या दिशेने वाहतूक करत होती. सकाळी ७ वाजताच्या सुमारास गाडीचे मागील चाक टायर पंक्चर झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे त्यांची गाडी रस्त्याकडेला विटांनी भरलेल्या एका टेम्पोला धडकली. यामुळे मोटारीच्या पुढील भागाचा चुराडा झाला असून या अपघातात पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
फय्याज शेख (५१), विकास कुमार (२१), शिवशंकर विक्रम आदित्य (३३), संतोष कुमार (२४) आणि प्रदीप प्रसाद (२४) अशी जखमींची नावे आहेत.
यापैकी तीन जखमींना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर संतोष कुमार आणि विकास कुमार यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबईतील सायन रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.