मुंबई: मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियममध्ये आपल्या घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचा २९ धावांनी पराभव करत विजयाचे खाते उघडले आहे. आयपीएल २०२४मधील मुंबईचा हा पहिला विजय आहे. याआधी मुंबईच्या संघाला सलग ३ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.
मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना २३४ धावा केल्या होत्या. आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दिल्लीकडून पृथ्वी शॉने ४० बॉलमध्ये ६६ धावांची खेळी केली तर अभिषेक पोरेल आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्या खेळीही दिल्लीला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत.
ट्रिस्टन स्टिब्सने २५ बॉलमध्ये ७१ धावांची नाबाद तुफानी खेळी केली. मुंबईकडून रोहित शर्माने ४९ धावा, इशान किशनने ४२ आणि अंतिम षटकांत टीम डेविड आणि रोमारियो शेफर्ड यांनी षटकारांनी वादळ आणले होते.
१५ षटकानंतर दिल्ली कॅपिटल्सची धावसंख्या ३ बाद १४४ होती. पुढील ५ षटकांत त्यांना विजयासाठी ९१ धावा हव्या होत्या. १६व्या षटकांत ९ धावा आल्या. यात ऋषभ पंतची विकेट पडल्यानंतर दिल्ली बॅकफूटवर आली. मात्र ट्रिस्टन स्टब्ज अजूनही क्रीजवर टिकून होता.शेवटच्या ३ षटकांत दिल्लीला ६३ धावा हव्या होत्या. १७व्या षटकांत जसप्रीतने ८ धावा दिल्या. याचवेळेस मुंबईचा विजय निश्चित झाला होता. त्यानंतर पुढील दोन षटकांत त्यांना ५५ धावा करायच्या होत्या. मात्र ते त्यांना शक्य झाले नाही आणि मुंबईने २९ धावांनी विजय मिळवला.