या भेटीत कोणत्या गप्पा झाल्या?
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी रात्री उशीरा भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
या रात्रीच्या भेटीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही भेट अराजकीय गप्पा मारण्यासाठी मी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेलो होतो अशी प्रतिक्रिया दिली असली तरी या दोघांमध्ये नेमकी कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.
गेल्या काही दिवसांत राज ठाकरे यांनी भाजपने घेतलेल्या काही भूमिकांवर टीका केली होती. त्यामुळे काही दिवसांपासून राज ठाकरे आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचे दिसून येत आहे. आशिष शेलार आणि राज ठाकरे यांनी एकमेकांवर टीका देखील केली होती. यानंतर भाजप आणि राज ठाकरे यांच्यात बिनसल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.
त्याआधी आगामी मुंबई महानगरपलिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजप-शिवसेना युती होणार असल्याच्या चर्चा होत्या. पण गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता, राज ठाकरेंनी भाजपच्या काही भूमिकांना विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस राज ठाकरे यांच्यातील या भेटीला महत्व आहे.