मनोज जरांगे म्हणाले, २९ फेब्रुवारीपर्यंत आरक्षण दिले नाही, तर…
जालना : मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) विधेयक काल विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत पास झाले आणि मराठ्यांना नोकरी व शिक्षणात १० टक्के आरक्षण लागू झाल्याची घोषणा राज्य सरकारने (Maharashtra Government) केली. यासाठी सामाजिक व आणि शैक्षणिक मागासवर्ग असा प्रवर्ग निर्माण करत मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देऊ केलं आहे. मात्र, तरीही मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगेंचं (Manoj Jarange) अद्याप समाधान झालेलं नाही. आम्ही या आरक्षणाची मागणी केलीच नसून सगेसोयऱ्यांच्या बाबतीत निर्णय व्हावा, असं जरांगेंनी काल म्हटलं. त्यानुसार आज त्यांनी पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, उद्यापासून मराठा बांधवांनी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना मराठा आरक्षणासाठी निवेदन द्यावं. २४ तारखेपासून राज्यभर रोज सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करायचं. ज्यांना शक्य नसेल त्यांनी दुपारी ४ ते ७ रास्तो रोको करायचा. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यासाठी त्यांनी सरकारला २९ फेब्रुवारी ही तारीख दिली आहे.
…तर मराठ्यांच्या तरुणांचं सात वर्षांचं नुकसान होईल
”कालचं आरक्षण आपल्या आंदोलनामुळेच मिळालेलं आहे. परंतु ते आरक्षण आम्हाला नकोय. देशतली ही पहिली घटना आहे गरीबांनी श्रीमंतांना आरक्षण दिलं. ज्यांना स्वतंत्र आरक्षण पाहिजे होते, त्यांना मिळालं आहे. तेही आरक्षण रद्द झालं तर मराठ्यांच्या तरुणांचं सात वर्षांचं नुकसान होईल.” अशी भीती जरांगेंनी बोलून दाखवली.
काय आहेत मनोज जरांगे यांच्या मागण्या?
- कुणबी नोंदी शोधून त्यांच्या परिवारांना प्रमाणपत्र द्यावं.
- सगेसोयऱ्यांच्या बाबतीत दोन दिवसात निर्णय घ्यावा.
- हैदराबाद गॅझेट लागू करुन कुणबी-मराठा एकच असल्यचा निर्णय घ्या.
- एका ओळीचा आदेश काढून मराठ्यांचा ओबीसीत समावेश करा.
- अंतरवालीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे सरसकट मागे घ्या.
- माजी न्यायमूर्ती संदीप शिंदेंच्या समितीला मुदतवाढ द्या.
२९ फेब्रुवारीपर्यंत आरक्षण दिले नाही, तर…
राज्य सरकारने मराठा समाजाला २९ फेब्रुवारीपर्यंत आरक्षण दिले नाही, तर मराठा समाजातील वृद्धांनी आमरण उपोषणाला बसावे. यापैकी एकही व्यक्ती मेली तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची असेल, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.