Saturday, May 4, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra News : परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर

Maharashtra News : परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर

महाराष्ट्राबाहेर गेलेल्या प्रकल्पांची चार दिवसांत श्वेतपत्रिका काढणार

मुंबई : बाहेरून येणारी परकीय गुंतवणूक (foreign investment) तसेच उभारले जाणारे उद्योग यांना सुलभपणे काम करता यावे याकरिता आणले जाणारे मैत्री विधेयक बहुमताने संमत करण्यात आले आहे. या विधेयकावर विधान परिषदेत बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी मागच्या अकरा महिन्यात महाराष्ट्रात एक लाख १८ हजार ४२२ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक राज्यात आल्याचे स्पष्ट केले. परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र आता पुन्हा पहिल्या क्रमांकावर आहे, असे ते म्हणाले.

मागच्या काही काळात वेदांता फॉक्सकॉन, पीडीपी असे काही प्रकल्प कोणत्या कारणामुळे महाराष्ट्राबाहेर गेले हे स्पष्ट करणारी श्वेतपत्रिका येत्या चार दिवसांमध्ये सादर केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाने जानेवारी २०२२ मध्ये राज्य सरकारकडे अर्ज केला होता. त्यांना पुण्यामध्ये दोन हजार एकर जागा दाखवण्यात आली. ही जागा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये होती. दोन महिन्यानंतर हाय पॉवर कमिटीची बैठक झाली. मात्र त्यात या उद्योगाचा आणि त्याला देण्यात येणाऱ्या जागेचा विषय झाला नाही. यासाठी पुढची संमती देणारी कॅबिनेटची सब कमिटी १४ महिन्यानंतर अस्तित्त्वात आली. त्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात राहिला नाही. ही सब कमिटी आमच्या सरकारच्या काळात आली. त्यानंतर या कमिटीने तीन वेळा बैठका घेतल्या. या तीन बैठकांमध्ये आम्ही एक लाख कोटींपेक्षा जास्त परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आणली, असेही उद्योगमंत्र्यांनी सांगितले.

बारा बलुतेदारांसाठी महाड आणि रत्नागिरी येथे क्लस्टर उभारण्याचा एक पायलेट प्रोजेक्ट केला जाईल. नंतर कोल्हापूर येथे तसाच एक प्रोजेक्ट केला जाईल. सातारा येथे कॉरिडोर उभारण्यासाठी तीन हजार एकर जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले. रायगडमध्ये लेदर क्लस्टर उभारले जाईल. रत्नागिरीमध्ये मँगो पार्क, रांजणगावमध्ये आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक पार्क, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे चाळीस हजार कोटींचे स्टील प्रोजेक्ट, रायगड जिल्ह्यातच सिनॉर्मस कंपनी उभारली जाईल. औषध क्षेत्रातील पीडीपी प्रकल्प महाराष्ट्र सरकार स्वतःच्या पैशाने उभारेल, असेही सामंत यांनी सांगितले.

रतन टाटांना महाराष्ट्राचा पहिला ‘उद्योगरत्न पुरस्कार’ जाहीर

महाराष्ट्र भूषण पुरस्काराप्रमाणे देशातल्या उद्योग क्षेत्रात नावाजला जाणारा उद्योग रत्न (Udyog Ratna Award) हा पुरस्कार महाराष्ट्र शासन या वर्षीपासून सुरू करत असून पहिला पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना देण्यात येणार आहे, अशी घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत केली. तरुण, महिला तसेच मराठी उद्योजक अशा तीन प्रवर्गासाठी आणखी तीन पुरस्कार देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार साहित्य, कला, क्रीडा आणि विज्ञान या क्षेत्रामधल्या अलौकिक कामगिरीसाठी प्रदान करण्यात येतो. त्याच धर्तीवर उद्योगक्षेत्रातील योगदानासाठी या वर्षीपासून ‘उद्योगरत्न पुरस्कार’ देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या बैठकीत पहिला पुरस्कार टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.

रतन नवल टाटा हे टाटा समूहाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांना उद्योग आणि व्यापार क्षेत्रात चांगल्या कामगिरीसाठी २००० मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्याकडे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून मानद डॉक्टरेट आहे. नोव्हेंबर २००७ मध्ये फॉर्च्यून मासिकाने त्यांना व्यवसायातील २५ सर्वात प्रभावशाली लोकांपैकी एक असल्याचं जाहीर केलं होतं. मे २००८ मध्ये टाटा यांचा समावेश टाइम मासिकाच्या २००८ च्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत करण्यात आला होता.

यावर्षीच्या एप्रिलमध्ये रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान, ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ने गौरवण्यात आलं होतं. तसेच त्यांना इतरही अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

रतन टाटा यांच्या टाटा ग्रुपच्या कंपन्या दानशूरपणाबद्दल ओळखल्या जातात. याचा प्रत्यय कोरोना महामारीतही दिसून आला आहे. कोराना महामारीच्या काळात देश संकटात असताना त्यांनी भारत सरकारला तब्बल १५०० कोटी रुपये दान स्वरुपात दिले होते.

रतन टाटांच्या आयुष्यावर चित्रपट येणार

देशातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर रतन टाटा यांचे आयुष्य मांडण्यात येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुधा कोंगरा (Sudha Kongara) या रतन टाटा यांच्या बायोपिकचे (Ratan Tata biopic) दिग्दर्शन करणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -