विरेंद्र सेहवागचे मत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लखनऊने दहा षटकांनंतर एक गडी गमावून १०२ धावा केल्या होत्या. या धावसंख्येनंतर त्यांनी सामना एवढ्या मोठ्या फरकाने गमावला नसता. पहिला गडी तंबूत परतल्यानंतर त्यांनी फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजाला पाठवायला हवे होते. दीपक हुडा फलंदाजीसाठी आला तेव्हाच लखनऊने सामना गमावला, असे मत भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने व्यक्त केले. गुजरातविरुद्ध रविवारी झालेल्या लखनऊच्या पराभवानंतर सेहवागने आपले मत व्यक्त केले. एका क्रिडा वाहिनीशी सेहवाग बोलत होता.
सेहवाग म्हणाला की, पहिली विकेट पडल्यानंतर निकोलस पूरन, मार्कस स्टॉयनिस, स्वतः कर्णधार कृणाल पंड्या किंवा चेन्नईविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात वेगवान धावा करणारा आयुष बडोनी यांच्यापैकी एखादा फलंदाज खेळू शकला असता. पण दीपक हुडा फलंदाजीला आला. जो सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे.” दीपक हुडा फलंदाजीसाठी आला तेव्हाच लखनऊने सामना गमावला असे सेहवाग म्हणाला.
२२८ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊने अप्रतिम सुरूवात केली होती. क्विंटन डिकॉक (७०) आणि कायल मेयर्स (४८) यांनी सामन्यात चुरस आणली होती. नवव्या षटकात कायल मेयर्स बाद झाल्यानंतर दीपक हुडा खेळपट्टीवर आला. यानंतर लखनऊची धावगती मंदावली आणि संघावर दबाव वाढत गेला. हुडा सध्या फॉर्ममध्ये दिसत नाही. पहिल्या ९ सामन्यांत त्याने केवळ ५३ धावा केल्या. त्याचबरोबर निकोलस पूरन आणि आयुष बडोनी हे चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. पण लखनऊच्या व्यवस्थापनाने दीपक हुडावर विश्वास दाखवला. याचाच दाखला देत विरेंद्र सेहवागने लखनऊच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केला.