मुंबई : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे होणाऱ्या रिफायनरीबाबत (Barsu Refinery) आज मुंबईत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी या प्रकल्पाबाबत इत्यंभूत माहिती देण्यात आली. या प्रकल्पासाठी स्थानिक धरणांऐवजी कोयना धरणातील पाणी वापरणार असल्याचे उद्योगमंत्र्यांनी सांगितले. तसेच यातून विविध टप्प्यांवर ५ लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सामंत म्हणाले, आमदार राजन साळवी आणि आमच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक ठेवण्यात आली होती. याचा पुढचा टप्पा जे शेतकरी विरोध करत आहेत आणि जे समर्थन करत आहेत, या सर्वांच्या शंका दूर करायच्या आहेत पण आधी याची माहिती लोकप्रतिनिधींना असायला हवी, यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित असलेले स्थानिक आमदार राजन साळवी यांनी आमच्या विभागाला या रिफायनरीबाबत सकारात्मक पत्र दिले होते त्यावर सांगोपांग चर्चा झाली.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला या प्रकल्पाबाबत एक पत्र दिले होते. त्यानुसार, १३ हजार एकर जागेचे संपादन बारसूमध्ये होऊ शकते. पण यामध्ये सोलगाव, देवाचे गोठले, शिवणे या गावांनी याला विरोध केला होता. साळवी यांची मागणी होती की, ही तीनही गावे या प्रकल्पात येणार नाही, ही मागणी मान्य करण्यात आली आहे.
एकूण ६,२०० एकर जागा या प्रकल्पासाठी मिळवायची आहेत. त्यापैकी २९०० एकर जागेसाठी तिथल्या जमीन मालकांनी संपत्तीपत्र दिलेली आहेत. या प्रकल्पाचा आवाका २ लाख कोटीचा आहे. यामध्ये बांधकाम फेजमध्ये सुमारे १ लाख लोकांना रोजगार, ऑपरेशन फेजमध्ये ३ लाख लोकांना त्यानंतर थेट रोजगार ७५ हजार लोकांना मिळणार आहे, असेही यावेळी सामंत यांनी सांगितले.
तसेच कोयना धरणातून पाणी रिफायनरीसाठी वापरण्यात येणार आहे. त्यासाठी टाकण्यात येणारी पाईपलाईन ज्या शहरातून व गावातून जाईल, त्यांना देखील पाण्याचा टॅब दिला जाणार आहे. पण पाणीपट्टी संबंधित गावांनी भरायची आहे, असा खूलासाही सामंत यांनी यावेळी केला.