मुंबई: शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताच आज जितेंद्र आव्हाड यांनीही पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. लोकशाहीत त्यांना लोकांचे ऐकावेच लागेल. लोकांच्या बाजूने निर्णय घ्यावा लागेल, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त होते. मात्र, प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी आपण राजीनामा दिला नसल्याचे सांगितले. सध्याही राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष कोण होणार यासाठी बैठकावर बैठका सुरू आहेत.
दरम्यान, आव्हाडांसोबत ठाण्यातील राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवले. जितेंद्र आव्हाड याबाबत म्हणाले की, शरद पवारांसाठी आमचे आयुष्य काहीच नाही का? ही लढाई आम्ही शरद पवारांशिवाय कशी काय लढणार? मी आतापर्यंत जी-जी भूमिका घेतली, ती लोकांनी आणि नंतर पक्षाने घेतली. शरद पवार नेहमी नव्या लोकांना संधी देतात. आता आम्हीही राजीनामा दिला आहे. नव्या लोकांना घ्यावे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली.