अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या पाण्याचे पूजन करून डाव्या कालव्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दुपारी झाले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरण जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा प्रकल्प ठरणार आहे. डावा, उजवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील १८२ गावांमधील ६८ हजार ८७८ हेक्टर (१ लाख ७० हजार २०० एकर) शेतजमिन ओलिताखाली येणार आहे.
सिन्नर तालुक्यातील ६ गावांमधील २,६१२ हेक्टर शेतजमीन वगळता अहमदनगर जिल्ह्यातील ६६ हजार २६६ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे.