राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले मोदी सरकारचे कौतुक
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खासदारांसमोर केले संबोधित
नवी दिल्ली : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) या उद्या म्हणजे १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यापूर्वी आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला औपचारिकपणे सुरुवात झाली असून या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी संसदेत अर्थसंकल्पासंदर्भात खासदारांना संबोधित केले. मागील वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगले गेले आहे. भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. तसेच गेल्या १० वर्षात २५ कोटी लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर आले आहेत. यामुळे 25 कोटी लोकांची गरिबी दूर झाली असून देशातील उर्वरित लोकांसाठी हा आशेचा किरण असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटले.
जम्मू-काश्मीरमधील आरक्षणामुळे राज्याच्या विकासाला गती मिळेल, असेही त्यांनी सांगितले. कोणताही देश तेव्हाच प्रगती करतो जेव्हा तो तरुणांच्या क्षमतेचा पुरेपूर फायदा घेतो असेही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. भारतातील लोकांना राम मंदिर उभारणीची वर्षानुवर्षे अपेक्षा होती आणि आता हे स्वप्न पूर्ण झाले आहे. तसेच जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याबाबत शंका व्यक्त केल्या जात होत्या, मात्र, ते देखील हटवण्याचा निर्णय झाल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या.
संसदेने तिहेरी तलाकविरोधात कायदा केला आहे. याच संसदेने शेजारी देशातून येणाऱ्या अत्याचारित नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा कायदा केला आहे. तसेच सरकारने मिशन मोडवर लाखो नोकऱ्या दिल्या आहेत. वन रँक वन पेन्शनची तरतूद केली आहे. भारतीय लष्करात प्रथमच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची नियुक्ती करण्यात आल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या.
भारताची निर्यात वाढली
गेल्या १० वर्षांत आपण भारताला पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये सामील झाला आहे. भारताची निर्यात सुमारे ४५० अब्ज डॉलरवरुन ७७५ बिलियन डॉलरपेक्षा जास्त झाली असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. एफडीआय पूर्वीच्या तुलनेत दुप्पट झाला आहे, खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांची विक्री चार पटीने वाढली असल्याचा उल्लेख देखील राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात केला आहे.
आयकर भरणाऱ्यांची संख्या वाढली
दरम्यान, आयटीआर (Income tax return) भरणाऱ्यांची संख्या ३.१५ कोटींवरुन ८.१५ कोटी झाली आहे. ही वाढ दुप्पट आहे. दशकभरापूर्वी देशात केवळ काहीसे स्टार्टअप होते. जे आज एक लाखांहून अधिक झाले आहेत. वर्षभरापूर्वी ९४ हजार स्टार्टअपची नोंदणी झाली होती. जी गेल्या वर्षी १.६ लाख झाली आहे. जीएसटी भरणाऱ्यांची संख्या १.४ कोटींवर पोहोचली आहे.
१० वर्षात २१ कोटींहून अधिक वाहनांची खरेदी
गेल्या १० वर्षात देशातील जनतेने २१ कोटींहून अधिक वाहनांची खरेदी केली आहे. २०१४-१५ मध्ये २००० इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती, तर २०२३-२४ मध्ये डिसेंबर महिन्यापर्यंत १५ लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या दशकात सरकारने सुशासन आणि पारदर्शकता हा अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार बनवला आहे. ज्यामुळं भारताने मोठ्या आर्थिक सुधारणा केल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. गेल्या १० वर्षांत वित्तीय तूट नियंत्रणात आहे, तर परकीय चलनसाठा ६०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. भारताची बँकिंग व्यवस्था जगातील सर्वात मजबूत बँकिंग प्रणाली बनली आहे. भारतीय बँकांचा एनपीए पूर्वी दुहेरी अंकात होता, आता तो एक अंकावर आला आहे.
भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन निर्यातदार देश
भारत आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन निर्यातदार देश झाला असल्याचा उल्लेख देखील राष्ट्रपतींनी यावेळी केला.