पुणे:विश्वचषक २०२३मधील १७व्या सामन्यात आज भारताचा मुकाबला बांगलादेशशी होत आहे. हा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. या मैदानावर ९ महिन्यांनी आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जात आहे. या वर्षी जानेवारीमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात पुणे येथे टी-२० सामना खेळवण्यात आला होता. यात श्रीलंकेने भारताला १६ धावांनी हरवले होते.
बांगलादेश संघ भारतात भारताविुद्ध २५ वर्षानंतर एकदिवसीय सामना खेळत आहे. गेल्यावेळेस १९९८मध्ये बांगलादेश आणि भारत यांच्यात मुंबईच्या वानखेडे मैदानावर सामना खेळवण्यात आला होता. दोन्ही संघाच्या मागच्या ५ सामन्यांबाबत बोलायचे झाल्यास बांगलादेशने तीन तर भारताने दोन सामने जिंकले आहेत.
पुण्यात बुधवारी हलकासा पाऊस झाला. एमसीए स्टेडियममध्ये दोन्ही संघाच्या सरावादरम्यान अचानक पाण्याचे थेंब टपकू लागले. यामुळे ग्राऊंड स्टाफला मुख्य पिचवर कव्हर घालावे लागले. स्थानिक हवामान विभागाने बुधवारी हलका पाऊस तसेच काळे ढग राहतील अशी शक्यता व्यक्त केली होती.
दरम्यान, अॅक्युवेदरच्या रिपोर्टनुसार गुरूवारी पावसाची शक्यता नाही आहे. दिवसभार तापमान ३२ डिग्री सेल्सियस इतके राहू शकते. तर पावसाची शक्यता १ ते ४ टक्के आहे. जर पाऊस झालला तर सामन्यावर याचा परिणाम होऊ शकतो.
पुण्यात दुपारच्या वेळेस आर्द्रता ५० टक्के राहू शकते. तसेच हवेचा वेग २२ किमी प्रति तास राहील. येथे संध्याकळच्या वेळेस दव असू शकतो. त्यामुळे टॉस नक्कीच महत्त्वाचा ठरू शकतो.
फलंदाजीत चांगली संधी
पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये आतापर्यंत ७ वनडे सामने झालेत त्यात पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या संघाने ४ वेळा तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने ३ वेळा विजय मिळवला आहे.