मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सध्या कोरोना निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे फटाके उडवत दिवाळी उत्साहात साजरी होत आहे. मात्र आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या पाच दिवसांत फटक्यांमुळे आग लागल्याच्या ५८ घटना घडल्या आहेत. तर यंदा नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत विविध कारणांमुळे आगीच्या १४१ घटनांची नोंद झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
कोरोना निर्बंधामुळे गेल्यावर्षी दिवाळी साजरी करता आली नव्हती. त्यामुळे दरवर्षीपेक्षा फार कमी फटाके वाजवण्यात आले होते. त्यावेळी गेल्यावर्षी दिवाळीत फटाक्यांमुळे आगीच्या केवळ ३५ घटना घडल्या होत्या. गेल्या पाच दिवसांत आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. विविध कारणांनी यंदाच्या नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत तब्बल १४१ आगीच्या घटना घडल्या आहेत. तर १ ते ५ नोव्हेंबर या काळात फटाक्यांमुळे आग लागल्याच्या ५८ घटना घडल्या आहेत.
दरम्यान लक्ष्मी पूजनच्या दिवशी फटाक्यांमुळे सर्वाधिक आगीच्या घटनांची नोंद झाली आहे. ४ नोव्हेंबर रोजी मुंबईत फटाक्यांमुळे ३३ आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर ५ नोव्हेंबरला फटाक्यांमुळे १९ आगीच्या घटना घडल्या आहेत. तर, १ ते ३ नोव्हेंबर दरम्यान सहा ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. मात्र यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही.
फटाक्यांमुळे लागलेल्या आगीच्या घटना
वर्ष – घटना
२०२१ – ५८
२०२० – ३५
२०१९ – ४७
दिवाळीच्या महिन्यांत विविध कारणांमुळे आगीच्या घटना
वर्ष – घटना
२०२१ मध्ये ५ नोव्हेंबरपर्यंत – १४१
नोव्हेंबर २०२० – १२०
ऑक्टोबर २०१९ – १२६