सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विमा दावा करण्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. विम्याचा हप्ता तारखेवर न भरल्यास विमा दावा फेटाळला जाऊ शकतो, असे सर्वोच्च न्यायालयाने एका केसच्या सुनावणी दरम्यान म्हटले आहे. तसेच विमा पॉलिसीच्या अटींचा अर्थ लावताना कराराचे पुनर्लेखन करण्यास परवानगी नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे.
न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी यांच्या खंडपीठाने सांगितले की, विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती काटेकोरपणे समजून घेतल्या पाहिजेत. तसेच विम्याच्या करारासाठी विमाधारकाचा पूर्ण विश्वास असणे आवश्यक आहे.
तक्रारदाराच्या पतीने जीवन सुरक्षा योजनेअंतर्गत १४ एप्रिल २०११ रोजी आयुर्विमा महामंडळाकडून जीवन विमा पॉलिसी घेतली होती. ज्या अंतर्गत महामंडळाकडून अपघात झाल्यास ३,७५,००० रुपये आणि मृत्यू झाल्यास अतिरिक्त ३,७५,००० रक्कम देण्याची हमी देण्यात आली होती.