मुंबई : शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकरांनी साधारण आठवडाभरापूर्वी ‘भाजपकडून सापत्न वागणूक मिळते’, असे वक्तव्य केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात विरोधी पक्षांकडून प्रतिक्रियांना उधाण आले होते. भाजपवर नेहमीच डोळा ठेवून असणार्या पक्षांना हातात आयते कोलित मिळाले होते. मात्र आता कीर्तीकरांनी आपल्या वक्तव्यावरुन यू-टर्न घेतला आहे. भाजपकडून सापत्न वागणूक मिळते असं मी म्हणालोच नाही, तर तो शब्द माझ्या तोंडी घातला गेला, असे कीर्तीकरांनी स्पष्ट केले.
“भाजपाकडून सापत्न वागणूक मिळते असं मी बोललोच नाही तो शब्द माझ्या तोंडी घातला गेला. आम्ही एनडीएचे घटक पक्ष म्हणून खासदार म्हणून तिथे वावरत होतो. आम्हाला एनडीएच्या घटक पक्षाचा दर्जा नव्हता. एकनाथ शिंदेंनी उठाव केला, त्यानंतर आमची आणि भाजपाची युती झाली आता आम्ही एनडीएचे घटक आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. आम्ही खासदार म्हणून भाजपासह गेलो. त्यामुळे आम्ही आता एनडीएचे घटक आहोत हे त्याठिकाणच्या केंद्रीय मंत्र्यांना कळले नाही का? की आम्ही आहोत तिथेच ते समजतात की काय? हा माझा त्यामागचा बोलण्याचा हेतू होता”,
मागच्या वर्षी जून महिन्यात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १३ खासदारांनी शिवसेनेत बंडखोरी केली. त्यानंतर भाजपाबरोबर जात एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केलं. त्यामुळे सरकारच्या वर्षपूर्तीच्या आतच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये खटके उडू लागले आहेत का? याच्या चर्चा कीर्तिकरांच्या वक्तव्यामुळे सुरु झाल्या होत्या. मात्र या चर्चा आता कीर्तीकरांनीच खोट्या ठरवल्या आहेत.