मुंबई : मविआच्या काळात रखडलेले अनेक प्रकल्प महायुती सरकारने सुरु करुन ते पूर्णत्वास नेले. त्यापैकीच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे कोस्टल रोड (Coastal Road). कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) या कोस्टल रोडची पाहणी केली. यावेळी ३१ जानेवारीला कोस्टल रोडचा पहिला टप्पा मुंबईकरांसाठी सुरु होईल, अशी आनंदाची बातमी त्यांनी दिली. यानंतर कोस्टल रोडवर कोणत्याही प्रकारचा टोल आकारला जाणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली.
गेले काही महिने राज्यभरात टोलचा मुद्दा चांगलाच गाजला. राज ठाकरे यांच्यासह अनेक विरोधकांनी यावर निदर्शने केली. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेऊन याविषयी चर्चादेखील केली. सुरुवातीला शिवडी न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंकवर २५० रुपये टोल आकारण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. या निर्णयाविरोधात विरोधकांकडून टोलेबाजी करण्यात आली.
परंतु आता मुंबई वरळी कोस्टल रोडवर कोणत्याही प्रकाराचा टोल आकारणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या डोक्यावरील एक मोठा ताण हलका होणार आहे. दरम्यान हा मार्ग लवकरच मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
कोस्टल रोडचा प्रकल्प नेमका कसा?
प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाय ओव्हर ते वांद्रे वरळी सी लिंक पर्यंतचा १०.५८ किमीचा कोस्टल रोड तीन पॅकेजमध्ये विभागला आहे.
प्रिन्सेस स्ट्रीट पूल – प्रियदर्शनी पार्क = ४.०५ किमी
प्रियदर्शिनी पार्क ते बडोदा पॅलेस = ३.८२ किमी
बडोदा पॅलेस ते बांद्रा वरळी सियामुलेलींक = २.७१ किमी
कोस्टल रोडच्या कामामुळे समुद्रात भराव टाकण्यात आले आहेत. समुद्राच्या लाटांचा प्रभाव रोखण्याकरता नैसर्गिक बेसॉल्ट खडकांची समुद्र भिंत तयार करण्यात आली आहे. मरिन ड्राईव्हवर आहेत तसे कॉक्रिंटचे टेट्रापॉड वापरणे टाळले आहे. तसेच, मरिन ड्राईव्हसारखाच प्रियदर्शिनी पार्क ते वरळीपर्यंतचा भलामोठा नवा मानवनिर्मीत सागरी किनारा मुंबईकरांना मिळणार आहे. तिथे मरिनड्राईव्ह सारखीच बसण्याची, विरंगुळ्याची ठिकाणे आहेत.