मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसांची सुरूवात होत आहे. उन्हाळा सुरू झाला की शरीरात पाण्याची कमतरता जाणवू लागते. अनेकदा उन्हामुळे डिहायड्रेशनचा त्रास जाणवतो. अशातच डॉक्टर या दिवसांमध्ये भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. उन्हाळ्याचा त्रास दूर करण्यासाठी काहीजण कोल्ड्रिंक पितात तक काहीजण लस्सी. मात्र यामुळे फक्त थोडा वेळच थंडावा जाणवतो पण हे आरोग्यासाठी हानिकारक असतात.
उन्हाळ्यात सर्वाधिक लाभदायक असते ते ताक. ताक पिण्याचे बरेच फायदे आहेत. यामुळे केवळ पाचनक्रियाच सुधारत नाही तर अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. तसेच वेगाने वजनही कमी होते.
डायजेशन सुधारते
ताक आपल्या पचनक्रियेसाठी वरदानाप्रमाणे आहे. ताकामध्ये चांगले बॅक्टेरिया आणि लॅक्टिक अॅसिड असते जे पचनासाठी मदत करतात. तसेच शरीरात मेटाबॉलिज्म वाढवतात.
ताजेतवाने वाटते
ताक आपल्या शरीराला थंडावा देते. जिरे, पुदिना आणि मीठासोबतचे ताक एक ग्लास प्याय्याने तहान भागली जाते.
डिहायड्रेशन रोखते
ताक दही आणि पाण्याने बनवले जाते. यात ९० टक्के पाणी आणि पोटॅशियमसारखे इलेक्ट्रोलाईट असतात. ताकामुळे शरीरात पाण्याची पातळी नियंत्रित राहते.
रोगप्रतिकारक क्षमता वाढते
रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आतडे चांगले असणे गरजेचे असते. ताक आतड्यांना निरोगी राखण्याचे काम करते. तसेच पचनक्रिया सुरळीत करते.