नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेले वर्षभर दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. संघटनेने केलेल्या आवाहनानुसार शनिवारी सकाळपासून सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या सर्व ठिकाणांवरून शेतकऱ्यांनी माघारी परतण्याची तयारी सुरू केली आहे. शनिवारपासून येथील जागा रिकाम्या करण्यास सुरुवात झाली आहे.
तीन कृषी कायदे पंतप्रधान मोदी यांनी मागे घेतल्याचे जाहीर केल्यावर आणि हे कायदे संसदेत रद्द करण्याचे सोपस्कार पार पडल्यावर दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन संपल्याचे शेतकरी संघटनेर्फे गुरुवारी जाहीर केले होते. दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या तीन सीमेवर शेतकरी १५ महिने ठाम मांडून आंदोलन करत होते. आता या सर्व जागा रिकाम्या करायला सुरुवात झाली आहे.
इतक दिवस आंदोलन सुरू असतांना उभारण्यात आलेले भक्कम असे तंबू, कमानी, मंडप हे सर्व काढण्यास सुरुवात झाली आहे. याचबरोबर मुक्काम करण्याच्या हेतूने सोबत आणलेले साहित्य, आवश्यक सामान, पशूधन हे गाड्यांमधे भरून परतीचा मार्गाला शेतकरी लागले आहेत, शेतकरी घरी परतण्यास सुरुवात झाली आहे.