नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियाकडून कमी किमतीत कच्च्या तेलाची आयात करण्याच्या भूमिकेचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी समर्थन केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढत असताना भारतीयांना कमी किमतीत ऊर्जा निर्माण करता यावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आपण रशियाकडून कमी दरात कच्चे तेल आयात करत आहोत, असे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी म्हटले आहे. ते बँकॉकमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना बोलत होते.
सर्व देशांना विकासासाठी ऊर्जेची गरज आहे, मग कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती लक्षात घेता फायदेशीर व्यवहार करण्याकडे त्यांचा कल असतो. भारतानेही हाच मार्ग अवलंबला असल्याचे एस जयशंकर यांनी म्हटले आहे. युक्रेन आणि रशिया दरम्यान सुरू असेलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने निर्बंध घातले असतानाही भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात सुरू ठेवली आहे.
भारतीयांचे दरडोई उत्पन्न हे दीड लाख रुपयांच्या जवळपास आहे. त्यामुळे आपला देश महाग किमतीमध्ये उर्जा खरेदी करू शकत नाही. त्यामुळे भारतीयांसाठी सर्वात चांगला व्यवहार करणे हे आपले कर्तव्य आहे. भारतीयांचे हितसंबंध जपण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असेही ते यावेळी म्हणाले. रशियातील तेल आयातीवरून अमेरिका सातत्याने भारताला लक्ष्य करताना दिसत आहे. या प्रश्नी भारतावर होणाऱ्या टीकेवर बुधवारी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी उत्तर दिले आहे.