पालघर तालुक्यातील मनोर विभागात असलेले वरई गाव येथे गेल्या ४३ वर्षांपासूनची ‘एक गाव, एक गणपती’ ही परंपरा आजतागायत गावकऱ्यांनी जपली आहे. येथील गावकऱ्यांनी १९४६ मध्ये ‘श्रीं’ ची मातीची मूर्ती बनवून गणेशोत्सवाला सुरुवात केली. तत्कालीन पोलीस पाटील हरिश्चंद्र पाटील यांनी व त्यांच्या साथीदारांनी ओम साई मित्र मंडळाची स्थापना केली. ज्याला आज ४३ वर्षे उलटली असून, तेव्हापासून ‘एक गाव, एक गणपती’ ची परंपरा गावात आजतागायत सुरू आहे.
हे गाव म्हणजे कुणबी, आदिवासी समाजाचे गाव असे ओळखले जाते. गावातील सर्व मंडळी एकत्र येऊन पाच दिवसांच्या बाप्पांची स्थापना करतात. गावात प्रथम पूजेचा स्थान जर कोणाला करायचे असेल तर त्यांनी मंडळाला एक महिन्या अगोदर कळवून तो मान मिळवून घेतात, ही परंपरा गेल्या ४३ वर्षांपासून अजतागायत सुरू आहे.
वरईच्या राजाला यावर्षी जगभरात भारताची मान उंचावणारा चांद्रयान ३ चा देखावा देण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे कोणाकडूनही देणगी घेत नाही. ज्यांना स्वखुशीने द्यायचे असेल ते मंडळाजवळ जमा करतात. सकाळ – संध्याकाळची पूजा, आरती, प्रसाद व दिवाबत्ती यथाशक्ती पाच दिवस केली जाते. यामध्ये गावातील सर्व मंडळींचा समावेश असतो. या उत्सव काळात गावातील रस्ते, परिसराची श्रमदानातून साफसफाई केली जाते. अनेक जण व्यसन सोडण्याची शपथ घेतात. गावातील कलाकारांना प्रोत्साहन दिले जाते. गणेशोत्सवात भजन, कीर्तन, बालनाट्ये, मुलांची भाषणे, स्त्री – भ्रूणहत्या विरोधी जनजागृती व महिलांचे सक्षमीकरण, सामाजिक उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा केला जातो. तर उत्सव कालावधीच्या पाच दिवस दोन वेळच्या महाप्रसादाचे आयोजन गेल्या ४३ वर्षांपासून साई मित्र मंडळ करीत आले आहे.