मुंबई : शेतकऱ्यांच्या हातात पीक येईपर्यंत वीज तोडणी तीन महिने तात्पुरती थांबवली असून वीज पुरवठा खंडित केलेल्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा पूर्ववत होणार असल्याची घोषणा, उर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज विधानसभेत केली. बँकेचे कर्ज, त्यामुळे महावितरणची परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महावितरण कंपनीची आर्थिक अडचण लक्षात घेऊन थकीत वीजबिल वेळेवर भरण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंतीदेखील त्यांनी केली.
शेतकरी, व्यापाऱ्यांच्या वीज तोडणीवरुन विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला आज धारेवर धरले. त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या वीज तोडणी बाबतचा विषय गांभीर्याने घेतला आहे. विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता पिक हातात येईपर्यंत म्हणजेच पुढील तीन महिने शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नसून, वीज तोडणी केलेल्या शेतकऱ्यांचादेखील वीज पुरवठा पुन्हा पूर्ववत केला जाणार असल्याची घोषणा उर्जामंत्री राऊत यांनी केली. राऊत यांच्या या घोषणेनंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांना प्राथमिकता देण्याचे उदिष्ट समोर ठेवून तसेच या विषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून वीज तोडणी केलेल्या शेतकऱ्यांचा पुरवठा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, सभागृहात विरोधी पक्षाने शेतकऱ्यांच्या वीज तोडणीवरून सरकारवर हल्लाबोल करत शेतकऱ्यांची वीजबिलं माफ करण्याची मागणी केली आहे.