मुंबई: राज्यात स्वाभिमान विरुद्ध गद्दार असा संघर्ष पेटला असताना शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत खळबळजनक विधान केलं आहे. एकनाथ शिंदे यांचं बंड यशस्वी झालं नसतं तर त्यांनी सर्व आमदारांना परत पाठवून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती. शिंदे यांनी आमदारांसाठी जीवाचीही पर्वा केली नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत, असं केसरकर म्हणाले.
केसरकर म्हणाले, एकनाथ शिंदे म्हटलं ज्यावेळी मला बंड यशस्वी होईल की नाही, असं वाटत होतं, त्यावेळी एकच केलं असतं, माझ्यासोबत आलेल्या सर्व आमदारांना परत पाठवलं असतं, एक फोन करून माझी चुक झाली, यात आमदारांची काही चूक नाही, असं सांगून तिथंच डोक्यात गोळी झाडून घेतली असती, असं केसरकर म्हणाले.
आमदारांचे नुकसान होऊ नये, प्रसंगी जीव गेला तरी चालेल, असं म्हणणाऱ्या माणसाच्या मागे लोक उभी राहणार तर कोणाच्या मागे राहणार. तुम्हाला सर्व काही परंपरेतून मिळालं. पण शिंद्यांना ते त्यांच्या वागण्यातून मिळाले. राजकारणात काय होईल ते होईल, पण एक सच्चा माणूस जनतेसाठी झगडतो, हा प्रेम करण्याजोगाच मनुष्य असतो. म्हणूनच हे प्रेम महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना दिलं पाहिजे, त्यांना काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन केसरकर यांनी केले.
शरद पवारांची बंडखोरी, अन् आमची गद्दारी?
शरद पवार काही आमदारांसह बाहेर पडले, त्यावेळी त्यांनी बंड केलं. ते जर बंड असेल तर आमचा काय गद्दारी आहे काय? असा सवाल केसरकर यांनी उपस्थित केला आहे. अनेक आमदार, खासदारांना भेट मिळत नव्हती. ते राजा आहेत का, हवं तसं वागायला? अशी टीकाही केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर केली.