Sunday, May 19, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वChandrayaan-3 : चांद्रयानमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला ‘चार चाँद’ लागणार

Chandrayaan-3 : चांद्रयानमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला ‘चार चाँद’ लागणार

  • अर्थभूमी : उमेश कुलकर्णी

चांद्रयान-३ च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला चार चांद लागणार आहेत. आर्थिक विकासाच्या नव्या संधी त्यामुळे खुल्या होणार आहेत. अंतराळ विज्ञानाशी संबंधित स्टार्ट अप्स आणि संबंधित क्षेत्रांना याचा फायदा होणार आहे. २३ ऑगस्ट २०२३ हा दिवस भारतासाठी ऐतिहासिक दिवस होता. भारताचे चांद्रयान तिसऱ्या प्रयत्नात यशस्वीपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले. देशभरात जल्लोष झाला. एकशे चाळीस कोटी देशवासीयांनी भारताचा चंद्रावरील विजय साजरा केला. पण तितकेच यश या मोहिमेचे नाही. त्यापलीकडे जाऊन आर्थिक बाबतीत विचार केला तर असे लक्षात येते की, अनेक क्षेत्रांमध्ये संधींची लाटच आता येणार आहे. त्यामुळे भारताच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. देश जो जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचे स्वप्न पाहत आहे, ते साकार होण्याची शक्यता वाढली आहे.

अंतराळ तंत्रज्ञान, संरक्षण, संशोधन आणि विकास या क्षेत्रांसाठी अधिक नव्या विकासाच्या संधी खुल्या होणार आहेत. या क्षेत्रांमध्ये खासगी गुंतवणूकही वाढणार आहे. ती वाढली तर तरुणांना नव्याने रोजगार आणि अधिक प्रमाणात उपलब्ध होतील. त्याचा लाभ नंतर आर्थिक विकासालाच होणार आहे. अंतरिक्ष विज्ञान क्षेत्रासाठी सरकारची अर्थसंकल्पीय गुंतवणूकही त्यामुळे वाढणार आहे. सध्या देशात १४० नोंदणीकृत अंतरिक्ष तंत्रज्ञान स्टार्ट अप्स आहेत. यशस्वी चांद्रयान मोहिमेमुळे त्या प्रत्येकाला जोरदार चालना मिळणार आहे. कमी खर्चात उपग्रह प्रक्षेपण करणारा देश म्हणून भारताचा नावलौकिक वाढणार असून अंतराळ विज्ञान आणि संरक्षण आदींना मोठी चालना मिळणार आहे. अनेकविध देशांचे उपग्रह प्रक्षेपण करण्याच्या मागण्या भारताकडे नोंदवल्या जातील. परिणामी भारताचे आर्थिक उत्पन्न वाढून त्याचा अंतिम फायदा रोजगार निर्मिती आणि परकीय चलन वाढण्यात होईल. चांद्रयान मोहीम ही सर्वात मोठा मैलचा दगड ठरला आहे. कारण सध्याच्या स्थितीत जागतिक अंतराळ अर्थव्यवस्थेत भारताचे योगदान केवळ ते ३ टक्के आहे. पुढील आठ ते दहा वर्षांत ते आठ ते दहा टक्के इतके होण्याची आशा जागवली आहे. यावरून भारत हा कमी खर्चात उपग्रह प्रक्षेपित करणारा देश म्हणून उदयास येणारा म्हणून ख्यातकीर्त पावणार असून भारताकडे जागतिक संधी येणार आहे, असा आशावाद साऱ्या वैज्ञानिकांना वाटत आहे. तो अनाठायी नाही कारण भारताच्या चांद्रयान मोहिमेस केवळ ६१ कोटी रुपये खर्च आला होता आणि रशियाच्या चंद्रमोहिमेला याच्या दुप्पट खर्च आला. तरीही ती मोहीम अपयशी ठरली. भारतात सध्याच्या घडीला १४० अंतराळ विज्ञानाशी संबंधित स्टार्ट अप्स आहेत. चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर या स्टार्ट अप्समध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची अपेक्षा आहे. त्यामुळे वैज्ञानिकांची देशात मागणी वाढणार असून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. इतकेच नव्हे; तर मूलभूत विज्ञानाकडे मुलांचा ओढा वाढणार आहे. तसे तर वैज्ञानिक कधीही अालिशान जीवन जगत नसतात. इतके महत्त्वाचे काम करूनही त्यांना कधीही सेलेब्रिटीचे स्टेटस प्राप्त होत नाही. तरीही मुलांना आता आपणही वैज्ञानिक व्हावे, असे वाटेल. डेलॉईट इंडियाचे भागीदार अनंदशयनम यांच्या मते शतकातून एखादीच अशी वेळ येते की, देश इतका महत्त्वाचा मैलाचा दगड गाठतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षिली जाईल आणि त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळू शकेल. परिणामी देशाच्या अर्थव्यवस्थेलाच मोठी चालना मिळेल. हा नुसता आशावाद नाही तर त्याचे दृष्यफल दिसू लागले आहे. जागतिक बँकेचे अध्यक्ष, अमेरिका आदी अनेकांनी भारताचे अभिनंदन केले आहे. त्यामुळे जगभरात ‘इस्रो’चा विश्वास आणि त्याबद्दल आदर वाढला आहे.

भारतीय वैज्ञानिकांबद्दल जगभरात आज आदराने मते व्यक्त केली जातात. यापुढे देशाच्या अर्थसंकल्पात विज्ञानासाठी तरतूद वाढणार, हे तर निश्चित आहे. संरक्षण, आरोग्य याचबरोबर विज्ञानासाठी तरतूद वाढणे हेही आवश्यक आहे. त्यासाठी आता नवीन चालना आणि उत्साह वाढणार आहे. विज्ञानाधिष्ठित क्षेत्रे आणि त्यांत गुंतवणूक याला चालना मिळाल्याने भारताच्या आर्थिक विकासाचे नवे दालन उघडले जाणार आहे. जगातील सर्वोच्च तीन अर्थव्यवस्थांमध्ये जाण्यासाठी आता उत्साह वाढणार आहे आणि त्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न सुरू होतील. ज्या देशांनी अंतराळात चांगली प्रगती केली आहे, त्या देशांच्या यादीत आता भारत वरच्या स्थानी सन्मानाने जाऊन बसला आहे. त्यामुळे भारतीय वैज्ञानिकांकडे आता जगात सन्मानाने पाहिले जाईल. त्यांच्यासाठी नोकरीच्या संधी अधिक उपलब्ध होतील आणि त्यामुळे ते परदेशी जाऊन परकीय चलनाचे प्रवाह देशात आणतील. केरळमध्ये जेव्हा भारतीय अधिक संख्येने परदेशात गेले तेव्हा, त्यांनी तेथील डॉलर्सचा ओघ भारतात आणला होता. त्याचीच पुनरावृत्ती होणार आहे. अंतराळ विज्ञानात कार्यरत असलेल्या कंपन्यांना अधिक उत्साह आता नव्याने निर्माण होईल, अशी आशा कार्तिक गणपती यांनी व्यक्त केली. ती अनाठायी नाही. चांद्रयान उतरवण्यातील कौशल्य भारताने प्रकट केले आहे. त्याची पावती म्हणून अधिक गुंतवणूक आणि त्यामुळे अधिक रोजगार असे चित्र तयार होणार आहे. अगोदरच भारतात बेरोजगारी प्रचंड आहे. याचे भांडवल अनेक विरोधकांनी केले आहे. आता मात्र ती कमी होणार आहे, याबद्दल विरोधक मूग गिळून बसतील. कारण त्यांची स्वतःची बेरोजगारी आता सुरू होईल.

या यशस्वी मोहिमेच्या यशाचे श्रेय मोदी यांच्यापासून हिरावून घेण्याचे घृणास्पद प्रयत्न विरोधकांनी चालवला आहे. पंडित नेहरू यांनी इस्रो स्थापन केली म्हणून त्याचे श्रेय नेहरूंना देण्याचा प्रयत्न काही विरोधकांच्या चाणक्य म्हणवल्या जाणाऱ्या वयोवृद्ध नेत्यांनीही केला. पण नेहरूंनी इस्रो स्थापन केली तरीही त्यांना याचे श्रेय जात नाही. ते जाते ते मोदी यांनाच. कारण त्यांच्याच मार्गदर्शनाखाली वैज्ञानिकांनी काम केले आणि चांद्रयान मोहीम यशस्वीपणे पार पाडून दाखवली. त्यात दिवंगत नेत्यांचे श्रेय अर्थातच नाही. काँग्रेसला काहीही चांगले झाले तरीही त्याचे श्रेय लाटण्याची सवय लागली आहे. त्यांचे योगदान शून्य असते. तरीही काँग्रेस असले लज्जास्पद प्रयत्न करत असते. त्यामुळे चांद्रयान मोहीम यशस्वी झाली तरीही यशाचे श्रेय मोदींपासून हिरावून घेण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकत नाहीत. कारण मोदी यांचेच मार्गदर्शन आणि प्रेरणा हेच या मोहिमेच्या केंद्रस्थानी आणि इस्रोच्या वैज्ञानिकांचे प्रयत्न आहेत. हे सारे जग जाणते. मोदी यांचेच हे श्रेय आहे. पण ते त्यांना दिले तर विरोधक म्हणून आपले कर्तव्य पालन होणार नाही, असे काँग्रेसला वाटत असते. त्याला कुणाचाच इलाज नाही.

umesh.wodehouse@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -