शेषराव वानखेडे
जगामध्ये ६० ते ६५ बौद्ध राष्ट्र आहेत. त्यापैकी भारताचाही त्यात समावेश करावा लागेल. इ. स. ६५० मध्ये भगवान गौतम बुद्ध यांच्या काळात बुद्ध धम्माचा मोठा प्रभाव होता. कालांतराने तो कमी झाला. मात्र त्यानंतर सम्राट अशोक यांनी पुन्हा बुद्ध धर्माचे पुनरुज्जीवन केले. सम्राट अशोकाने त्या काळात बुद्धविहारे, स्तूप, लेण्या अशी जवळपास ८४ हजार एवढी संख्या होती. त्या विहारांमधून भिक्खू वर्गाने धर्मगुरूंच्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार करून पुन्हा धार्मिक वातावरण तयार केले. मुळात गौतम बुद्धांनी कोणत्याही कर्मकांडाचा पुरस्कार केला नाही. विज्ञानाच्या आधारावर चालणारा, टिकणारा हा धर्म आहे, अशीच त्याची ठेवण निर्माण करून त्याची जपणूक केली.
प्रज्ञा, शिल आणि करुणा याची त्याला जोड देण्यात आली. बुद्धांच्या निर्वाणानंतर हा धर्म लयास जातो की काय, अशी भीती वाटत होती; परंतु सम्राट अशोकाने त्यास पुन्हा संजीवनी मिळवून दिली. पुढे सम्राट अशोकानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धर्माचा सखोल अभ्यास केला. याच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सम्राट अशोकाने आपली कन्या संघमित्रा आणि पुत्र महिंद्रा यांना श्रीलंकेत पाठवले होते. गौतम बुद्धांना ज्या बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली, त्याची एक फांदी घेऊन खिस्तपूर्व २४५ मध्ये संघमित्रा यांनी श्रीलंकेत येऊन एक फांदी येथे रोवली. हे जगातील प्राचीन वृक्षारोपण समजले जाते. संघमित्रा आणि महिंद्रा यांनी श्रीलंकेत केलेल्या बौद्ध धर्माच्या प्रसार कार्यातून उतराई होण्याच्या उद्देशाने महामहिंद धम्मदूत सोसायटीने २४ ऑगस्ट १९६७ मध्ये श्रीलंकेहून बौद्ध धर्माच्या प्रचार व प्रसारासाठी दुसरी तुकडी भारतात पाठवली. या तुकडीत पूज्य भदन्त एन.
आनंद महाथेरो आणि त्यांचे गुरुबंधू एम. सरणकर व भन्ते सुगतवंश हे तिघे मद्रास मार्गे (आताचे चेन्नई) मुंबईत दाखल झाले. त्यानंतर ६ डिसेंबर १९६७ रोजी भदन्त एन. आनंद महाथेरो यांचे उल्हासनगर येथे आगमन झाले. उल्हासनगर येथील नारायण सोनकांबळे यांनी डॉ. भदन्त एन. आनंद महाथेरो यांच्याबद्दल ‘धम्मदीप’ या शीर्षकाचे पुस्तक लिहिले. भदन्त एन. आनंद महाथेरो केवळ १९ वर्षांचे असताना भारतात आले. भारतात आल्यानंतर भदन्त एन. आनंद यांनी मराठी, हिंदी, पाली व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवणाऱ्या अशा आदर्शवत भिक्खूचा जीवनपट लोकांसमोर या ‘धम्मदीप’ या पुस्तकातून पुढे आणण्याचे काम लेखकाने केले आहे. भदन्त एन. आनंद महाथेरो यांचं उल्हासनगर येथे आगमन केव्हा आणि कसे झाले? त्यावेळची सामाजिक, धार्मिक चळवळ आणि भौगोलिक परिस्थिती कशी होती, याचा आढावा या पुस्तकात घेतला आहे.
धम्मप्रचारासाठी बर्मा, कोरिया, इंग्लंड आदी राष्ट्रे पायाखाली घातली. आज भारतीय समाज विशेषतः महाराष्ट्रीयन लोकांमध्ये प्रगल्भता येत चालली आहे, त्याचे बरेचसे श्रेय डॉ. भदन्त एन. आनंद यांना जाते, असे पुस्तकाचे लेखक नारायण सोनकांबळे यांनी म्हटले आहे. एन. आनंद महाथेरो यांचे धम्माप्रती कार्य आणि त्यांची निष्ठा जाणून घेण्यासाठी धम्मबांधवांनी एकदा हे पुस्तक वाचले पाहिजे. या पुस्तकात बौद्ध बांधवांसाठी बुद्ध धर्मातील महान तपस्वींची छायाचित्रे, महाथेरो एन. आनंद यांची गाथा पठण, धम्मदेसना आदींची भरपूर छायाचित्रे देण्यात आली आहेत. तसेच गाथा, अष्टपरिकार असे बरेच काही लेखकाने त्यात दिले आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचनीय आहे.