Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीDevendra Fadnavis : 'उबाठाचे बाळराजे' म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली

Devendra Fadnavis : ‘उबाठाचे बाळराजे’ म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली

आधीचे मुख्यमंत्री दिल्लीहून हात हालवत परत यायचे : देवेंद्र फडणवीस

कोस्टल रोड उद्घाटनप्रसंगी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मुंबई : कोस्टल रोड (Coastal Road) प्रकल्पातील वरळी ते मरीन ड्राईव्ह या टप्प्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. यामुळे प्रवाशांना वरळी ते मरीन ड्राईव्ह (Worli To Marine Drive) हे अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करता येणार आहे. या उद्घाटनावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील उपस्थित होते. यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली. तसेच आदित्य ठाकरेंचा (Aditya Thackeray) उल्लेख ‘उबाठाचे बाळराजे’ असा करत त्यांना सणसणीत टोला लगावला.

देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर त्यांचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, “मला काल समाजमाध्यमावर बघायला मिळालं की उबाठाचे बाळराजे सांगत होते की कोस्टल रोड आम्ही केला आणि आमच्या कामाचे श्रेय ते घेत आहेत. पहिल्यांदा तर मी त्यांना सांगतो की, आम्ही दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेणारे लोक नाहीत. जे काम आम्ही करतो, त्याचेच श्रेय आम्ही घेतो. या कोस्टल रोडची संकल्पना नवी नव्हती. मला आठवतं उद्धव ठाकरेंनी तर मुंबई महापालिकेच्या दोन निवडणुका या कोस्टल रोडचं प्रेझेंटेशन दाखवूनच पार पाडल्या. कोस्टल रोड मात्र कधी झालाच नाही,” अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली.

कोस्टल रोडसाठी परवानगी मिळत नव्हती

“२००४ ते २०१४ या काळात राज्य आणि केंद्रात यूपीएचं सरकार होतं. कोस्टल रोडची सर्वांत मोठी अडचण ही होती की, आपल्या नियमांत सी लिंक बांधण्यास परवानगी होती. पण कोस्टल रोड बांधण्यास परवानगी नव्हती. कारण कोस्टल रोड तयार करण्यासाठी रेक्लेमशन करावे लागते. रेक्लेमेशन केल्यावर सीआरझेडची लाईन बदलते. म्हणूनच रेक्लेमेशन करू देणार नाही, अशी केंद्राची भूमिका होती,” असंही फडणवीस म्हणाले.

आधीचे मुख्यमंत्री दिल्लीहून हात हालवत परत यायचे

पुढे ते म्हणाले, “मी याआधी अनेक मुख्यमंत्र्यांना कोस्टल रोडसाठी दिल्लीला जाताना पाहिलं. पण दिल्लीहून ते हात हालवत परत यायचे. केंद्राने त्यांना कोस्टल रोडसाठी परवानगी दिलीच नाही. केंद्रात मोदी आणि राज्यात महायुतीचं सरकार आलं. आम्ही कोस्टल रोड तयार करण्यासाठी परवानगी मिळवण्यास सुरुवात केली. मला आठवतं त्यासाठी केंद्र सरकारसोबत पाच बैठका झाल्या. प्रत्येक अडचणीवर आम्ही पर्याय काढू लागलो. सीआरझेडची लाईन बदलणार नाही, असं आम्ही केंद्राला सांगितलं,” अशी माहिती फडणवीसांनी दिली.

कोस्टल रोडच्या या टप्प्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी सुलभ होणार आहे. येत्या काही दिवसांत हा मार्ग वांद्रे-वरळी सी लिंकला (Bandra Worli See Link) जोडण्यात येणार आहे. त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते थेट वांद्रे सहज जाणे शक्य होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -