मुंबई, रायगडसह किनारपट्टी भागात धोक्याचा इशारा
पुणे : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ येत्या ४८ तासांत आणखी तीव्र होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या चक्रीवादळामुळे भारताच्या किनारपट्टी भागातही मोठा परिणाम होणार आहे. मुंबई, पालघरसह कोकण किनारपट्टी भागात या चक्रीवादळाचा परिणाम दिसू शकतो. गुजरातलाही या चक्रीवादळाचा फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या तीन दिवसांत ‘बिपरजॉय’ (Cyclone Biparjoy) तीव्र चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. या चक्रीवादळाचा परिणाम तीन दिवस दिसू शकतो. या पार्श्वभूमीवर देशाच्या किनारपट्टी भागातील आपत्ती व्यवस्थापन पथकांना आधीच सतर्क करण्यात आले आहे.
‘बिपरजॉय’ चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने पुढे सरकरत आहे. सध्या चक्रीवादळ कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारी भागातून पुढे सरकत आहे, पण याचा किनारपट्टी भागात परिणाम दिसून येईल. किनारपट्टी भागात जोरदार वादळी वारे वाहतील आणि काही भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील किनारपट्टी भागात मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. मुंबई, पालघर, रायगज, रत्नागिरी, सिंधुदुर्ग किनारपट्टीवर लाटा उसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.