ज्या गोष्टीची मोठी भीती सतत व्यक्त केली जात होती आणि ज्याची दहशत दिवसेंदिवस पसरत चालली होती तो कोरोना महामारीचा आणि कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग कमालीचा वाढल्याने वर्षाखेरीस पुन्हा एकदा राज्यासह मुंबईत कडक निर्बंध लागू केले गेले आहेत. ‘ओमायक्रॉन’च्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत या आधीच जमावबंदी लागू केलेली आहे. राज्यात एकाच दिवशी ३९०० रुग्णवाढ झाल्याने नागरिकांना घरातच नववर्षाचे स्वागत आणि थर्टी फर्स्ट साजरा करावा लागणार आहे. गेल्या काही दिवसांत दैनंदिन रुग्णसंख्येची दोनशेपर्यंत झालेली घसरण आता तेराशे – चौदाशेच्या पार गेली आहे.
मुंबईत अवघ्या चार दिवसांत दैनंदिन रुग्णसंख्या ६८३ वरून १,३७७ झाली आहे. कोरोनाच्या मागील दोन लाटांच्या तुलनेत हे प्रमाण चिंताजनक असले तरीही रुग्णालयात दाखल करावे लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मात्र कमी असल्याने ती एक दिलासादायक बाब म्हटली पाहिजे. विशेष म्हणजे कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या ७०६ वरून १,३७६ वर जाण्यास १२ दिवसांचा कालावधी लागला होता, तर दुसऱ्या लाटेत ६८३ असणाऱ्या दैनंदिन रुग्णसंख्या १,३२५ वर पोहोचण्यासाठी २० दिवसांचा कालावधी लागला होता. मात्र २०२१च्या अखेरीस येऊ घातलेल्या तिसऱ्या लाटेत कमी कालावधीत रुग्ण वाढत असल्याचे दिसून आले आहे. मुंबईत सध्या ५ हजार ८०३ रुग्ण उपचाराधीन आहेत,
तर मुंबईत अन्य कारणांमुळे ओढावलेल्या मृत्यूंची संख्या २,५६३ आहे, तर ठाणे जिल्ह्यात सध्या १,५०२ सक्रिय रुग्ण आहेत. रायगड जिल्ह्यात २९६ रुग्ण सक्रिय आहेत. मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सतर्क राहा. मात्र घाबरून जाऊ नका. कोरोनाच्या मागील दोन लाटांच्या तुलनेत हे प्रमाण चिंताजनक असले तरीही रुग्णालयात दाखल करावे लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. आपल्या सुरक्षेसाठी शिस्त पाळणे महत्त्वाचे आहे. मुंबईतील हॉटेल्सना ५० टक्के क्षमतेने सुरू राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल्स आणि बंदिस्त ठिकाणी असलेल्या कार्यक्रमांवर लक्षात ठेवण्यासाठी भरारी पथके कार्यरत आहेत.
तसेच काही संशयित आढळल्यास सीसीटीव्ही फुटेजही मागवण्यात येणार आहेत. दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असली तरीही रुग्णालयात दाखल होण्याची गरज लागणाऱ्या बाधितांचे प्रमाण मात्र त्यामानाने कमी आहे. असे असले तरी खबरदारी म्हणून कोरोना नियमांचे पालन करणे हे सर्वार्थाने गरजेचे आहे. तसेच एखाद्याला लक्षणे जाणवल्यास निदान, विलगीकरण आणि उपचारांना त्याने प्राधान्य देणे गरजेचे आहे. याबाबत दुर्लक्ष केले गेल्यास त्याच्या स्वत:च्या व इतरांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो आणि हे बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. सध्या संसर्गाच्या स्थितीचे विश्लेषण करण्यासाठी १५ जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे व त्यानंतरच अचूक व शास्त्रीय पद्धतीने तिसऱ्या लाटेचे विश्लेषण करता येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
राज्यात ओमायक्रॉनच्या ८५ रुग्णांची नोंद झाली. सध्या नव्या कोरोना रुग्णांच्या चाचण्यांवेळी काही नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जात आहेत. पुण्याच्या आयसर संस्थेने घेतलेल्या ३८ नमुन्यांच्या चाचण्यांमधून मुंबई आणि पुण्यात ओमायक्रॉन समूह संसर्ग सुरू झाल्याचे प्राथमिक निदान करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे सतर्कता बाळगावी लागणार आहे.
विशेष म्हणजे ओमायक्रॉनची बाधा झालेल्या अनेक रुग्णांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात ओमायक्रॉनच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात झाल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यांना जाणवणारी लक्षणे मात्र सौम्य आहेत, तर राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनचा वेगाने प्रसार होत असल्याचे म्हटले आहे. कोरोनाचे नवे रुग्ण ओमायक्रॉन व्हेरिएंटचेच आहेत का, याबाबत निश्चित माहिती नाही. पण गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत ज्या प्रकारे डबलिंग पाहायला मिळत आहे, त्यावरून हा ओमायक्रॉन व्हेरिएंट असावा.
कारण, या पूर्वीच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे कोरोना रुग्णांची संख्या इतक्या झपाट्याने वाढत नव्हती. या रुग्णांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज भासत नसल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. ही आणखी एक चांगली
गोष्ट आहे. कारण या आधीच्या कोरोना लाटांच्या वेळी ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरअभावी अनेकांना प्राण गमवावे लागले असल्याचा कटू अनुभव आपल्या गाठीशी आहे. त्यामुळे यांदाच्या लाटेत तशी स्थिती नसल्यास ती दिलासादायक बाब म्हटली पाहिजे, असे असले तरी सर्वांनी काळजी घेणे हे क्रमप्राप्तच आहे. मुंबई आणि परिसरात कोरोना रुग्णांची झालेली वाढ पाहून ती बाब कॅज्युअली घेतल्यास त्याची किंमत मोजवीच लागेल, असे चित्र सध्या दिसत आहे.