Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणमिऱ्या-नागपूर चौपदरीकरण कामात कंपनीचा अतिरेक

मिऱ्या-नागपूर चौपदरीकरण कामात कंपनीचा अतिरेक

पोलीस बंदोबस्तात ऐन पावसाळ्याच्या तोंडावर बांधकामावर जेसीबी

साखरपा : सध्या रत्नागिरी-नागपूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे सुरुवातीला रस्त्यांवरील मोठमोठी झाडे तोडण्यात आली. त्यानंतर टप्प्या टप्प्यात रुंदीकरण व रस्ता कटाई कामाला प्रारंभ झाला. सध्या साखरपा गावात हायवे बाधित बांधकामे तोडण्यास अचानक प्रारंभ झाला आहे. कंपनीला २ वर्षे कामाची मुदत असून लवकरात लवकर घरे खाली करावी, असे सांगण्यात आले आहे. मात्र या आधी कोणतीही सूचना किंवा नोटीस कोणालाही प्राप्त झालेली नाही. त्यातच अचानक पोलीस बंदोबस्तात सुरू झालेल्या या मोहिमेमुळे नागरिकांची तारांबळ उडाली. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर घरादारांवर जेसीबी फिरविण्यात आल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

पाऊस काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अशाप्रकारे कंपनीच्या अरेरावी विरोधात स्थानिक नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ऐन पावसाळ्यात कुठे जायचे? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर आहे. तसेच काही घरांना कुलूप असताना बांधकामे तोडली जात आहेत. कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यावेळी पाण्याचे मोठमोठे प्रवाह वाहतात. अशा वेळी मोठमोठे मातीचे ढीग करून मातीचे रस्ते तयार केले आहेत. यामुळे मोठ्याप्रमाणात चिखल होऊन अपघात घडू शकतात. याची कोणतीही खबरदारी कंपनीने घेतली आहे का असा सवाल येथील नागरिकांतून तसेच प्रवाशांतून उपस्थित केला जात आहे. फक्त कामाचा वेग असून चालत नाही, प्रतिबंधात्मक उपाययोजना होणे महत्त्वाचे आहे.

काही ठिकाणी घरे तोडण्याबाबत नागरिकांना राष्ट्रीय महामार्ग अधिकारी सहकार्याच्या भूमिकेत असून कंपनी प्रशासन मात्र हातोडा फिरवत आहे. तसेच काही ठिकाणी मोबदला मिळाला नसूनसुद्धा बांधकाम हटविण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग विभाग याकडे कसे लक्ष देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -