Monday, May 20, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यlove marriage : सामुदायिक आत्महत्या, प्रेमविवाह केला म्हणून हत्या

love marriage : सामुदायिक आत्महत्या, प्रेमविवाह केला म्हणून हत्या

  • फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे

मुलांना लहानपणापासून आपण चांगलं-वाईट, चूक-बरोबर काय, आयुष्यात निर्णय घेण्याचे महत्त्व, चांगल्या-वाईट निर्णयांचे आयुष्यावर होणारे परिणाम याबद्दल सांगत असतोच. त्यांच्यावर उत्तम संस्कारदेखील करीत असतो. तरीही काही बाबतीत आपल्याच मुलांची मतं आपल्यापेक्षा वेगळी असू शकतात, त्यांचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो हे स्वीकारणे आपल्याला इतके जड का जावे?

मुलांना कोणत्याही त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या बाबतीत जरी तो आपल्याला पटला नसेल तरी, त्याचे संभाव्य परिणाम, फायदे-तोटे लक्षात आणून देणे पालक म्हणून नक्कीच आपली जबाबदारी आहे. पण आपल्या सांगण्याला छेद देऊन, पण मुलांना त्यांचा अट्टहास मग तो कोणत्याही बाबतीत असो, पूर्णच करायचा असेल, तर आपण त्यांना ते व्यक्तिगत स्वातंत्र्य देऊ केलं पाहिजे. त्यांना स्वतःला त्या गोष्टीचा अनुभव घेऊन पाहू देणे, त्यांना स्वतःला चांगलं-वाईट समजणे, त्यांना बाहेरील जग, व्यवहार कळणे, माणसं ओळखणे हे स्वतः शिकू देणे आवश्यक आहे. यातूनही त्यांचा स्वमनाने, स्वमताने घेतलेला कोणताही निर्णय चुकला अथवा त्यांना पश्चाताप झाला तरी पालक म्हणून त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहणे, त्याला परत पाठिंबा देणे, आपल्या पाल्याला सावरणे आणि पुनःश्च नवीन आयुष्य सुरू करायला उमेद देणे हेच आपलं कर्तव्य आहे.

अशी कितीतरी लग्न आहेत, जी पालकांच्या, नातेवाइकांच्या पसंतीने साग्रसंगीत पद्धतीने होऊन सुद्धा अपयशी ठरली आहेत. अशी कितीतरी उदाहरणे आहेत जिथे पालकांच्या चुकीच्या निर्णयामुळे मुलांचं आयुष्य, भविष्य बरबाद झालेलं आहे. त्यामुळे आयुष्यात असा कोणताही मूलमंत्र नाही जो अंगीकारला तर सगळं मनाप्रमाणेच आणि सकारात्मक होईल. त्यामुळे इतक्या खालच्या पातळीचा विचार करताना, आपल्याच मुला-मुलीचा जीव घेताना पालकांनी कुठेतरी स्वतःची सद्सद्विवेकबुद्धी शाबूत ठेवणे अपेक्षित आहे.

अनेक तरुण मुला-मुलींनी घरातून आपल्या प्रेमविवाहाला मान्यता मिळणार नाही, या भीतीने स्वतःचे आयुष्य संपवलेले आहे. पालकांविषयी इतकी दहशत, इतकी भीती मुलांच्या मनात असणे रास्त आहे का? आपल्या मुलांना रागवण्याचा, ओरडण्याचा, थोडाफार धाक दाखविण्याचा पालकांना हक्क आहे. पण मुलांनी आपल्या भीतीने आत्महत्या करावी यासारखे दुर्दैव पालकांचे काय असू शकते. जर अपत्य आणि पालक यांच्यामध्ये विश्वासाचा इतका अभाव, संवादात इतकी दरी असेल तर त्या नात्याला अर्थ काय. आजमितीला दररोज वर्तमानपत्रांतून, सामाजिक माध्यमातून बहुतांश बातम्या या वैयक्तिक आत्महत्या, कुटुंबातील सदस्यांना जीवे ठार मारून स्वतः आत्महत्या करणे, सर्व कुटुंबाने सामुदायिक आत्महत्या करणे, अशा स्वरूपाच्या वाचायला मिळतात. याबरोबरच मुलाने अथवा मुलीने घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला, आंतरजातीय, आंतरधर्मीय, खालावलेल्या आर्थिक परिस्थितीमधील कुटुंबात केला, घरी न कळवता परस्पर लग्न लावून घेतले, घरच्यांनी पसंत केलेल्या मुलाला अथवा मुलीला लग्नासाठी नकार दिला यांसारख्या कारणांवरून त्या दोघांनाही अथवा त्यातील कोणाला एकाला कुटुंबातील सदस्यांनी संगनमत करून जीवे मारून टाकणे, अशा घटना सातत्याने पाहायला मिळतात. एकमेकांवर प्रेम असलेले; परंतु घरातून विवाहाला परवानगी मिळणार नाही हे माहिती असल्याकारणाने आधीच प्रेमी युगुलाने एकत्रित आत्महत्या करून जीवन संपवल्याची उदाहरणे पण समाजात मोठ्या प्रमाणावर आहेत.

एकीकडे आपण जागतिक मैत्री, जागतिक स्तरावर व्यवहार, परदेशात नोकऱ्या, उद्योग-व्यवसाय, आंतरराष्ट्रीय सलोखा, शांतता, सर्वधर्मसमभाव या विषयांचा पुरस्कार करीत असताना, ‘हे विश्वची माझे घर’ या उक्तीनुसार माणुसकी ही एकच जात आणि तोच एक धर्म ही विचार प्रणाली अंगीकारत असताना आपल्याच समाजात राजरोसपणे घडत असलेल्या अशा घटना पाहिल्या की, खरंच मन विषन्न होते. ज्या मुलांना आपण लहानाचे मोठे करतो, प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील त्यांना शिक्षण, उत्तम दर्जाचे आयुष्य, राहणीमान देण्याचा प्रयत्न करतो. ज्या पाल्याला आपण फुलासारखे जपतो त्याचा आपल्याच हाताने जीव घेताना कुठेही जराही या कुकर्माची भीती जन्मदात्या आई-वडील, भाऊ, इतर नातेवाइकांना वाटत नाही का? प्रत्येक कुटुंबात मतभेद असतात. सख्खे भाऊ-बहीण, स्वतःची सख्खी मुलं-मुली यांच्या छोट्या छोट्या आवडी एकमेकांपासून वेगळ्या असतात. कुटुंबात प्रत्येकाच्या आवडी-निवडी, सवयी, स्वभाव, दिनचर्या भिन्न असतात तरीही सर्व जण त्यात एकमेकांना सांभाळून घेतात, परस्परांच्या आवडीत, आनंदात समाधान मानतात आणि त्यालाच कुटुंब म्हणतात; परंतु पालकांच्या पसंतीशिवाय लग्न करणे म्हणजे असा कोणता अक्षम्य गुन्हा आहे, ज्याला मृत्यूदंड ही शिक्षा पालकांनी कायदा हातात घेऊन द्यावी.

आपल्या जीवनात अशी कोणतीही समस्या नसते, ज्यावर उपाय नाही अथवा पर्याय नाही. गरज असते स्वभाव आणि डोकं शांत ठेऊन, सगळ्यांना विश्वासात घेऊन, आलेल्या समस्या कशामुळे आल्या याची कारणे शोधणे, आपण कुठे चुकलो, कुठे कमी पडलो यावर विचारविनिमय करणे, सातत्याने त्याच चुका परत करण्याचे टाळणे, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या मदतीच्या पर्यायांना तपासणे, जात, पात, धर्म, पंथ, समाज, गणगोत या सगळ्यांचा पलीकडेदेखील दुनिया आहे. गरिबी, श्रीमंती, घराणं, खानदान, यापलीकडे देखील आयुष्य आहे. ते आपल्या मुलांना अनुभवायचं असेल, जगून पाहायचं असेल तर त्यांचा जीव घेऊन स्वतःच्या आयुष्याची उर्वरित वर्ष गुन्हेगार म्हणून जगण्यापेक्षा, कायदेशीर शिक्षा भोगत आयुष्य बरबाद करण्यापेक्षा मुलांच्या आनंदात सहभागी होऊन त्यात समाधान मानणे कधीही उचित असेल.

सर्व कुटुंबाने मिळून एकत्र आत्महत्या करणे, अथवा सर्व कुटुंबाला ठार मारून स्वतःचे जीवन संपवणे हा प्रकार आजकाल समाजात वाढत चाललेला आहे. मुळात आत्महत्या हे पाप आहे आणि तो कायदेशीर गुन्हादेखील आहे. त्यातून स्वतःच्या कुटुंबातील इतरांना जीवे मारून टाकणे हा अजून गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. आपल्याला इतकं सुंदर आयुष्य मिळूनदेखील देशासाठी नाही, समाजासाठी नाही, इतरांसाठी नाही, पण स्वतःसाठी सुद्धा आपल्याला धड जगता येऊ नये, या पोखरलेल्या, उद्विग्न झालेल्या मानसिकतेला काय म्हणावे. आजकाल आत्महत्या वाढण्याच्या मागील कारणे जर शोधली, तर अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी कुठेतरी आपणच जबाबदार असतो असे वाटते. खूप लवकर मोठे होण्याचे स्वप्न पाहणे, उच्च जीवनशैली मिळण्यासाठी सतत कर्ज काढत राहणे, आहे त्यात समाधानी न राहता चुकीचे आर्थिक व्यवहार करून त्याची परतफेड न करता आल्यास आपले आयुष्य संपवणे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. थोडाही तणाव आला की, व्यसनांचा सहारा घेणे, त्यातून अतिशय तरुण वयापासूनच तब्बेतीच्या समस्या उद्भवायला सुरुवात होते. स्वतःहून चुकीच्या मार्गाने पैसे मिळविण्यासाठी चुकीच्या कृतींमध्ये सहभागी होणे, बेकायदेशीर काम करणाऱ्यांची संगत धरणे, कुटुंबापासून लपवून परस्पर बाहेर उधाऱ्या, व्याजाने पैसे घेणे, खोटी कागदपत्रे बनवणे, खोट्या फसव्या आर्थिक योजनांना बळी पडणे, चुकीच्या ठिकाणी आपले पैसे गुंतवणे, घर, शेती, मालमत्ता गहाण ठेवणे आणि यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग राहिला नाही की मृत्यूला कवटाळणे, माणसाच्या चुकीची शिक्षा मात्र संपूर्ण कुटुंबाला भोगावी लागते. इच्छा असो-नसो मृत्यूला जवळ करावे लागते. अशाप्रकारच्या सामुदायिक आत्महत्यांमध्ये लहान मुलांचा तर हकनाक बळी जातो. त्यांची काहीही चूक नसताना, त्यांना परिस्थितीची यत्किंचितही जाणीव नसताना आई-वडील स्वतः केवळ स्वतःच्या चुकांची शिक्षा मुलांनादेखील जीवेमारून देतात. या सर्वअडीअडचणीवर मात करुन पुन्हा उभे राहिलेल्या, शून्यातून विश्व् निर्माण केलेल्या लोकांचा सल्ला घेणे आणि आपलं आयुष्य वेळेत सावरणे हें चांगल्या सुशिक्षित, सुसंस्कृत लोकांनादेखील का जमू नये? या विषयावर सर्वांनीच विचारमंथन करुन सामाजिक परिस्थिती बदलणे अनिवार्य आहे, असे वाटते.

meenonline@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -