Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीमराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही - मुख्यमंत्री

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही – मुख्यमंत्री

मुंबई: जालन्यामध्ये मराठा आंदोलनादरम्यान घडलेल्या गोंधळ प्रकरणाची दखल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यांनी ट्विटरवरून आंदोलनकर्त्यांना संयम राखण्याचा सल्ला दिला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही…

मराठा समाजाने संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये…

मी सर्वसामान्य मराठा शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला मुलगा आहे. समाजाच्या वेदना आणि व्यथांची मला जाणीव आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. आजवर अत्यंत समंजसपणे, शांतपणे आपल्या भावना व्यक्त केलेल्या मराठा समाजाला माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये. जालना जिल्ह्यातील आंदोलना दरम्यान झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.

या आंदोलनाचे नेते जरंगे पाटील यांच्याशी मी संवाद साधला होता. त्यांच्या मागण्यांबाबत माझ्या अध्यक्षतेखाली बैठकाही झाल्या होत्या. त्यांच्या मागण्यांवर शासनाकडून कार्यवाही सुरु होती. परंतु, त्यानंतरही आंदोलन सुरू झाले. जरंगे पाटील यांना आंदोलन मागे घेण्याची मी विनंती केली होती. मात्र, त्या दरम्यान आंदोलकांची प्रकृती खालावली. त्यांच्या जीवाची काळजी होती म्हणूनच जिल्हाधिकारी आणि एसपी तिथे गेले.

जरंगे पाटील यांनी रुग्णालयात दाखल व्हावे अशी विनंती त्यांना केली जात होती. मात्र, त्यावेळी ही दुर्देवी घटना घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच मी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी संपर्क साधला. त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही मी दिले आहेत. तसेच, या घटनेतील सर्व जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. नागरिकांनी आणि मराठा समाज बांधवांनी शांतता राखावी.

माझी मराठा समाजाला आंदोलकांना नम्र विनंती आहे की, त्यांनी कुठल्याही नेत्याच्या स्वार्थी राजकारणाला बळी पडू नये. मराठा समाजाला मी आवाहन करतो की, त्यांनी वस्तुस्थिती जाणून घ्यावी व कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये. हे शासन त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी खंबीरपणे उभे आहे. असे त्यांनी जाहीर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

 

मराठा आरक्षण तसेच इतर मागण्यासाठी जालन्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाले होते. या आंदोलनास अनेक गावांनी पाठिंबा देण्यास सुरूवात केली.

त्यानंतर गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांना फोन करून उपोषण मागे घेण्यास सांहितले मात्र ते घेतले गेले नाही. शुक्रवारीही या आंदोलनात विविध गावातून पाठिंबा वाढू लागला होता. त्यामुळे शुक्रवारी पोलिसांनी आंदोलन कऱणाऱ्या काही जणांना ताब्यात घेतले. यावेळेस पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यात तणावाची स्थिती निर्माण झाली. संतप्त आंदोलनकर्त्यांनी दगडफेक सुरू केली. त्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात काहीजण जखमी झाले. या घटनेचा निषेध सर्वच राजकारण्यांनी केला आहे. दरम्यान, मराठी समाजाने संयम बाळगण्याचे आव्हान केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -