नवी दिल्ली : मीटिंगसाठी उपस्थित सर्वांनी विराटला टी-ट्वेन्टी संघाचं कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करायला सांगितले. वर्ल्डकप जवळ येत असल्याने किमान भारतीय क्रिकेटसाठी तरी निर्णयाचा पुनर्विचार कर. ही चर्चा वर्ल्डकपनंतर व्हायला हवी होती. पण आम्ही विराट कोहली आणि त्याच्या निर्णयाचा सन्मान करतो, असा खुलासा निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी केला आहे.
टी-ट्वेन्टी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होताना आपण एकदिवसीय आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदी कायम राहू इच्छितो असं बीसीसीआयला सांगितलं होतं. पण वनडे कर्णधारपद काढून घेताना आपल्याशी चर्चा झाली नसल्याचा दावा विराट कोहलीनं केला होता. मात्र, चेतन शर्मा यांनी खोडून काढला.
“तो पूर्णपणे विराट कोहलीचा निर्णय होता. कुणीही विराटवर टी-ट्वेन्टीचे कर्णधारपद सोडण्यासाठी दबाव टाकला नव्हता. एकदा त्यानं ते सोडल्यावर निवड समितीला विचार करावा लागला. कारण आम्हाला वाटत होतं की पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेट प्रकारासाठी (एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी) एकच कर्णधार असावा. कारण त्यामुळे निवड समितीला इतर गोष्टींचं नियोजन करणं सोपं होतं. आम्ही त्याला याबाबत माहिती देखील दिली होती”, असं चेतन शर्मा यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं.
वनडे संघासाठीही नव्या कर्णधाराची निवड करण्याचा निर्णय निवड समितीचा होता, असं चेतन शर्मा म्हणाले आहेत. “आमचा निर्णय झाल्यानंतर मी लगेच विराट कोहलीला फोन केला. ती कसोटी संघाच्या निवडीसाठीची बैठक होती. आम्हाला त्या मीटिंगमध्ये विराटला याबद्दल सांगायचं नव्हतं. म्हणून मीटिंग संपल्यानंतर मी विराटला फोन करून सांगितलं की निवड समितीला वाटतंय पांढऱ्या चेंडूच्या दोन्ही प्रकारांसाठी एकच कर्णधार असावा. आमचं फार चांगलं संभाषण झालं”, असं चेतन शर्मा म्हणाले.