Friday, May 17, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यUPI : यूपीआयमधील बदल

UPI : यूपीआयमधील बदल

  • उदय पिंगळे, मुंबई ग्राहक पंचायत

मोबाइलने संपर्क क्षेत्रात ज्याप्रमाणे क्रांती घडवली त्याप्रमाणे ‘यूपीआय’ने आर्थिक क्षेत्रात क्रांती घडवली आहे. ‘एनसीपीआय’ म्हणजेच ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पाेरेशन ऑफ इंडिया’ हे याचे जनक आहेत. ही एक फायदा मिळवण्याचा हेतू नसलेली कंपनी असून रिजर्व्ह बँक आणि इंडियन बँक असोसिएशन यांनी स्थापन केलेली आहे. जी देशभरात किरकोळ आर्थिक व्यवहारांची परिपूर्तता करते. ते करत असताना ज्याला पैसे द्यायचे आहेत – त्याची बँकधारकाच्या चेकद्वारे, डेबिट/क्रेडिट कार्डद्वारे किंवा पेमेंट करण्याच्या प्रणालीतून व्यापाऱ्याच्या खात्यात जमा करते. यासाठी आधी वापरात असलेल्या प्रणालींना कमी/अधिक वेळ लागत असे. यूपीआय ही एकमेव अशी प्रणाली आहे, जी किमान माहितीच्या आधारे डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच यूपीआय ॲड्रेस, टेलिफोन नंबर, क्यू आर सससकोडद्वारे पेमेंट करण्याची सोय उपलब्ध करून देते. त्याचप्रमाणे व्यापाऱ्याने विक्रेत्याकडे पैशांची मागणी केल्यास त्या व्यवहारास मान्यता देऊन पेमेंट करू शकतो. त्यासाठी विशिष्ट मध्यस्थांचाच वापर केला पाहिजे असे नसल्याने, त्याचप्रमाणे सध्या ही सुविधा घेण्यासाठी कोणताही आकार नसल्याने, व्यक्ती आणि व्यापारी याशिवाय मित्र, नातेवाईक यांच्यातील आर्थिक व्यवहारही सुरळीत होत असल्याने अत्यंत लोकप्रिय झाली आहे. ३० सप्टेंबर २०२३ रोजी या सुविधेचे वापरकर्ते ३५ कोटी इतके झाले आहेत.

या माध्यमातून एकूण १००५६ कोटी व्यवहार झाले असून अजून अधिक व्यवहार करण्याची याची क्षमता आहे. जे रुपयांच्या भाषेत १६ लक्ष कोटी रुपयांच्या आसपास आहेत. किरकोळ व्यवहारातील याचा वाटा ९०% आहे. या व्यवहारांवर आता काही शुल्क लावले जाईल असे सूतोवाच वारंवार करूनही अजून त्याची अंमलबजावणी झालेली नाही. तरी अनेकांची मानसिक तयारी अशा बातम्यांमधून झाली असेलच. अलीकडेच या प्रणालीत ‘एनसीपीआय’ यांनी महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यामुळे आकर्षक असलेली सुविधा अधिक आकर्षित होण्याची शक्यता आहे त्या कोणत्या ते पाहू.

क्रेडिट लाइन – या सुविधेत ग्राहक त्याच्या बँकेने पुरवलेल्या डिजिटल क्रेडिट लाइनचा (एक प्रकराचे कर्ज) वापर करू शकतो. बँक आणि ग्राहक या दोघांच्या दृष्टीने ते सोयीस्कर आहे. सुयोग्य ग्राहकांना क्रेडिट लाइन देऊन बँका आपल्या व्यवसायात वाढ करू शकतील. ग्राहकांची गरज भागेल आणि त्यांना क्रेडिट कार्डची जरूर पडणार नाही. रक्कम वापरण्याची पद्धत नेहमीप्रमाणे आहे. याचा क्रेडिट कार्ड व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वाटते. सध्या एचडीएफसी बँक, पे झॅप, भीम, पेटीएम, जी पे यांनी आपल्या ग्राहकांना ही सुविधा देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे हे ॲप वापरणारे लवकरच या सुविधेचा अनुभव घेऊ शकतील.

यूपीआय लाईट एक्स – ज्या मोबाइलमध्ये निअर फिल्ड कम्युनिकेशन (NFC) सुविधा आहे अशा हँडसेटमधून मर्यादित प्रमाणात ऑफलाइन व्यवहार करता येऊ शकतील. ग्राहकांच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण सुविधा असून जेव्हा फोन पूर्णपणे ऑफलाइन तेव्हा पीअर टू पीअर व्यवहार नेटवर्क आणि इंटरनेट सुविधेशिवाय करता येईल याचा फायदा अंडरग्राऊंड मेट्रो नेटवर्क किंवा रिमोट नेटवर्क असलेल्या भागातील व्यवहार करताना होईल.

यूपीआय टॅप अँड पे – याचा वापर एनएफसी सुविधा उपलब्ध असलेल्या छोट्या क्रेडिट कार्डधारकांना होऊ शकेल. असे कार्ड मिळवण्यासाठी, या पद्धतीचे कार्ड देणाऱ्या बँकेत जावे. तेथे यूपीआय कार्ड ऑनलाइन तयार करणारे मशीन असेल. त्यात असलेल्या नमुन्यातून आपल्याला पसंत पडणारे कार्ड निवडा. यात दाखवलेला क्यूआर कोड आपल्या यूपीआय आयडीतून प्रामाणित करा. त्यानंतर सदर कार्ड आपल्या यूपीआय आयडीला जोडून घ्या. या सर्व पायऱ्या पूर्ण केल्यावर आपल्याला तत्काळ यूपीआय कार्ड मिळेल. याचा वापर आपण ‘यूपीआय टॅप अँड पे’ ही सुविधा वापरण्यास करू शकू.

हॅलो यूपीआय : ही एक सर्वांना आवडेल अशी नावीन्यपूर्ण योजना आहे. यानुसार आपल्या बोलण्यातून व्यवहार होऊ शकतात. डॉटकडे नोंदणी केलेल्या सर्वच ऑपरेटर्स आपल्या ग्राहकांना इंग्रजी आणि हिंदी भाषेतून संभाषण करण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे. त्याच्या मदतीने संभाषण ओळखणे, संभाषणात पडलेला खंड ओळखणे, टेक्सचे अंकात/संभाषणात रूपांतर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचबरोबर ‘भारत बिल पे’ यांनी बिल पे ही सुविधा सर्व भारतीय क्रमांकाना उपलब्ध करून दिला असून केवळ संदेशाद्वारे व्यवहाराची खात्री आणि व्यवहार होऊ शकतो. जर आपण जर स्मार्टफोनधारक नसाल तरी केवळ मिस कॉल देऊन व्यवहार पूर्ण करू शकतो.

उपलब्ध होऊ घातलेल्या या सुविधामुळे डिजिटल व्यवहारात वाढ होईल. समाजातील सर्वच घटक त्यात समावले जातील. याचा फायदा ग्राहक व्यापारी सर्वांनाच होईल. व्यवसायवृद्धी होईल.

या सुविधा वापरल्याने रोख व्यवहारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे रोख पैसे बाळगण्याची गरज उरणार नाही. सध्याच्या अर्थव्यवस्थेसोबत समांतर अर्थव्यवस्था (उदा. कामवालीचा पगार, भाजीवाल्याकडे खरेदी वगैरे) कार्य करीत असते ती खिळखिळी होईल.

आर्थिक मध्यस्थाच्या व्यवसायात वृद्धी होईल. नवनवे व्यवसाय यातून निर्माण होऊ शकतात. आर्थिक महासत्ता बनण्याचे करोडो भारतीयांचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल. एनपीसीआय यांनी सतत यूपीआयचे वापरकर्ते वाढावेत यासाठी अधिकाधिक प्रयत्न करत असून अधिकाधिक घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न करत असून यात यूपीआयचा मोठा सहभाग आहे. त्यांचे सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्याबरोबर आर्थिक विकास, आर्थिक स्वयंपूर्णता आणि कल्पकता याचा वापर करीत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -