मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंतीचा उत्साह संपूर्ण राज्यभरात दिसून येत आहे. मध्यरात्रीपासूनच धूमधडाक्यात जयंतीला सुरुवात झाली. आज सकाळपासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील चैत्यभूमी आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवर भीमसागर उसळला आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मूर्म, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशवासियांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला चैत्यभूमीवर जाऊन डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले.
आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमी परिसरात बाबासाहेबांच्या सुमारे १०० दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन भरवले आहे.
मुंबई महापालिकेने यंदा चैत्यभूमीवर जोरदार तयारी केली आहे. लाखोंचा लोटणारा जनसागर पाहून यावेळी नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.