मुंबई : कोकणातला गणेशोत्सव म्हटला की मुंबईतील चाकरमान्याला आपल्या गावी जायचे वेध लागतात. यंदाची गणेशचतुर्थी १९ सप्टेंबरला असून १६ मे पासून कोकण रेल्वेच्या आरक्षणाला सुरुवात करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे आरक्षण सुरु झाल्याच्या दुस-याच दिवशी आरक्षण फुल्ल झालं आहे. १२० दिवस आधीच आरक्षण फुल्ल झाल्यामुळे अनेक प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
अवघ्या पाच मिनिटात बुकिंग फुल्ल झाल्याने यात काळाबाजार होत असल्याची माहिती मिळत आहे. चाकरमानी गणेशोत्सवात गावी जाण्यासाठी काहीही करु शकतो, याची संबंधित दलालांना माहिती असल्याने त्यांनी तिकीट आरक्षणात काळाबाजार केल्याचे समजत आहे. याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या असून रेल्वे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने चाकरमान्यांकडून अधिकच नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान काही प्रवासी प्रतिक्षा यादीत तिकीट काढत आहेत, परंतु प्रतिक्षा यादीही ३०० ते ४०० च्या घरात पोहोचली आहे. तर काही गाड्यांची प्रतिक्षा यादीच संपली आहे. कोकण मार्गावर सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या कोकणकन्या एक्सप्रेस दुसऱ्याच दिवशी हाऊसफुल झाल्या आहेत.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याकरता दरवर्षी खासगी वाहने, एसटी, खासगी बसेसप्रमाणेच मेल एक्स्प्रेस गाड्याच्या तिकिटांना प्रचंड मागणी असते. त्यातच रेल्वे प्रवासास सर्वाधिक पसंती दिली जाते. दादर, वसई, ठाणे आणि पनवेल आदी स्थानकातून गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या रेल्वेच्या लांबपल्याच्या गाड्या प्रत्येक वर्षी भरभरून जात असतात. मात्र सामान्यांच्या खिशाला परवडणारी ही कोकण रेल्वे चार महिने आधीच फुल्ल झाली आहे.