भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या भरोसा सेल मार्फत २०२२ या वर्षात समुपदेशन करून ६८४ जणांचे संसार जोडण्यात यश प्राप्त झाले असल्याची माहिती भरोसा सेलच्या सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे यांनी दिली आहे.
महिलांच्या तक्रारींना प्राधान्य देत त्यांना समुपदेशन करून मानसिक आधार देणे. त्यांच्या तक्रारीचे निवारण करणे याकरीता मीरा-भाईंदर आणि वसई-विरार आयुक्तालयाच्या वतीने भरोसा सेलची गेल्या वर्षी स्थापना करण्यात आली आहे. वर्षभरात या सेलकडे १ हजार १२१ तक्रारी अर्ज प्राप्त झाले.
समुपदेशन करण्यासाठी समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्ति देखील कोणत्याही प्रकारची फी न घेता पोलिसांना मदत करत आहेत. यात ३ वकील, २ डॉक्टर आणि काही समाजसेवी संस्थांचा समावेश आहे.