Sunday, May 4, 2025

रिलॅक्ससाप्ताहिक

Sanjivani Samel : ‘संन्यस्त’ अभिनयाची ‘संजीवनी’

Sanjivani Samel : ‘संन्यस्त’ अभिनयाची ‘संजीवनी’
  • टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल

संजीवनी समेळ यांनी अभिनयाच्या क्षेत्रात आता आपला चांगलाच जम बसविला आहे. आता अनेक मालिका, नाटकांत त्या काम करीत आहेत. मालती जोशी व नागेश जोशी हे त्यांचे माता पिता. पिता सिव्हिल इंजिनीअर होते. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे, वांद्रे-वरळी सी लिंक त्यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण झाले. सायनच्या डी. एस. हायस्कूलमधून त्यांनी शिक्षण घेतले. आंतरशालेय नृत्य स्पर्धेत त्यांनी भाग घेतला होता. शाळेतील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. त्यांनी आकाशवाणीवर ‘किलबिल’ नावाची छोटी नाटुकली सादर केली होती. पोदार महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवी घेतली. त्यांना गायनाची व अभिनयाची आवड होती. महाविद्यालयामध्ये असताना कानुघोषाच्या कोरस ग्रुपमध्ये त्या असायच्या. नंतर त्या आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त गायिका झाल्या. पुढे त्यांनी अभिनयासाठी आकाशवाणीत परीक्षा दिल्या. त्यात त्या पास झाल्या. त्यामुळे वेगवेगळ्या श्रुतिकांमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली.

ज्येष्ठ पद्मविभूषण गायिका किशोरीताई आमोणकर, शरद जांभेकर, प्रभाकर पंडित यांच्याकडून त्यांनी गायनाचे धडे गिरवले. हिंदोळे स्वरांचे, सप्तरंग, निशिगंध या ऑर्केस्ट्रामधून त्यांनी गाणी गायली. १९९२-९३ मध्ये प्रभाकर पणशीकरांच्या ‘तो मी नव्हेच’ या नाटकात सुनंदा दातार ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली. ती भूमिका गाणाऱ्या स्त्रीची होती. निर्मात्या लता नार्वेकर यांनी त्यांना ‘मन उधाण वाऱ्याचे’ नाटकात काम करण्याची संधी दिली. त्यानंतर स्वतःच्या संस्थेच्या ‘कुसुम मनोहर लेले’ या नाटकात त्यांनी काम केले.

त्यानंतर अभिनयातील टर्निंग पॉइंट त्यांच्या जीवनात आला. ‘संन्यस्त ज्वालामुखी’ हे नाटक त्यांना मिळाले. त्यांचे पती नाटककार अशोक समेळ यांनी त्यांना या नाटकात तीन भूमिका दिल्या. स्वामी विवेकानंदांच्या आईची भूमिका, रामकृष्ण परमहंस मच्या पत्नीची भूमिका व एक अमेरिकन मिसेस हेल नावाच्या बाईची भूमिका. या तिन्ही भूमिका चांगल्या रीतीने वठवून घेण्याचं काम अशोकजींनी केलं.

या नाटकाचे चाळीस तासांत अकरा प्रयोग करून लिम्का वर्ल्ड ऑफ बुकमध्ये नोंद झाली. त्या चाळीस तासांत त्यांना ९९ वेळा कपडे बदलावे लागले. ४४ वेळा विग काढ-घाल करावा लागला. ४४ वेळा हातातील बांगड्या काढ-घाल कराव्या लागल्या. ४४ वेळा कानातले काढ-घाल करावे लागले. प्रयोगानंतर डॉक्टरांनी मला झोपून राहायला सांगितले होते. बेड रेस्ट घ्यायला सांगितला. कारण त्यांचा रक्तदाब वाढला होता. त्या दिवसापासून त्यांची रक्तदाबावरील जी गोळी सुरू झाली, ती आजतागायत आहे. त्यानंतर अशोक समेळ लिखित व दिग्दर्शित ‘ज्ञानोबा’ हे नाटक त्यांनी केलं.

त्यांचा मुलगा अभिनेता संग्राम समेळची १०वी झाल्यानंतर त्यांनी परत आपल्या करिअरकडे गांभीर्याने पाहायचे ठरविले. त्यानंतर ‘भाग्यलक्ष्मी’ या मालिकेत त्यांना काम मिळाले. त्यानंतर बंगाली मातृभाषा असलेले मराठी दिग्दर्शक दासबाबू यांच्याकडे अनेक मराठी मालिकांमध्ये कामे केली. त्यांच्या ‘तहान’ या मराठी चित्रपटामध्ये देखील काम केले. ‘जाडूबाई जोरात’, ‘अलमोस्ट सुफळ संपन्न’, ‘सुंदरी’ अशा अनेक मालिकांमध्ये त्यांनी कामे केली. आतापर्यंत जवळजवळ ५२ मालिकांमध्ये त्यांनी कामे केली आहेत. ‘आम्ही का तिसरे’, ‘येडा किशोर बेळेकर’ या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका केली. ‘आम्ही का तिसरे’ हा चित्रपट लक्ष्मी या तृतीयपंथीवर आधारित होता. लक्ष्मीच्या आईची भूमिका त्यांनी केली होती. अशा प्रकारे त्यांची पावले आता पुन्हा अभिनयाची वाट चालू लागली आहेत….

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
   
Comments
Add Comment