काय आहे कारण?
जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या लढयाला अखेर काल यश आले. राज्य सरकारने मराठा समाजाच्या (Maratha Samaj) सर्व मागण्या मान्य केल्या. त्यामुळे उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडले. संपूर्ण मराठा समाजात यानंतर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. ठिकठिकणी पेढे वाटून, गुलाल उधळून हा जल्लोष साजरा केला जात आहे.
हे आरक्षण मिळेपर्यंत घराच्या उंबर्यावर पायदेखील ठेवायचा नाही, असा निश्चय मनोज जरांगे केला होता. यामुळे ते घरी कधी येणार याची सर्वजण वाट पाहत असतानाच मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे गोदा पट्ट्यातील आंदोलकांची बैठक बोलावली आहे. आज दुपारी १२ वाजता ही बैठक होणार आहे.
मराठा आरक्षणाचा निर्णय झाल्यावर सर्व मराठ्यांची एक विजयी सभा आयोजित करण्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली होती. त्यानुसार आज बोलावण्यात आलेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. विजयी सभा कुठे आयोजित करायची, कधी करायची यावर चर्चा होणार आहे. या बैठकीत गोदा पट्ट्यातील प्रमुख मराठा आंदोलक उपस्थित राहणार आहेत. सर्वांच्या चर्चेनंतर यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.