सावध राहा, बेपर्वाई नको!

Share

सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागताचा उत्साह फार काळ राहात नाही, असे गेल्या तीन वर्षांपासूनचा अनुभव आहे. २०२० साली तर अभूतपूर्व स्थिती केवळ भारतीयांनीच नव्हे, तर संपूर्ण जगाने अनुभवली. जगातील व्यवहार ठप्प झाले होते. चीननंतर कोरोना नावाच्या विषाणूने जगभरात थैमान घातले. वर्ष संपता संपता त्याचा कहर कमी झाला. पण पुन्हा २०२१च्या फेब्रुवारीअखेरीस कोरोनाची दुसरी लाट येऊन धडकली. ती सर्वात धोकादायक ठरली. रुग्णालये भरून गेली. ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला. त्यात काही जणांनी जीव गमावला. या लाटेत अनेकांनी आपल्या आप्तांना गमावले. गणेशोत्सवाच्या आसपास ही लाट ओसरू लागली. पण डिसेंबर अखेरीस कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटचा धोका निर्माण झाला. याच्याच सावटाखाली नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आले.

सुदैवाने मोदी सरकारच्या पुढाकाराने गेल्या वर्षी जानेवारीत देशव्यापी लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. सुरुवातीला त्यावरून राजकारण झाले; परंतु त्यानंतर या लसीकरणाचे महत्त्व सर्वांनाच पटले. नव्या ओमायक्रॉन विषाणूने बाधितांच्या मृत्यूची संख्या जगभरात नगण्य आहे. पण भारतात लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्याने त्याचाही सकारात्मक परिणाम दिसत आहे. लसीकरणानंतरही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, मात्र त्यामुळे जीविताचा धोका कमी झाला असल्याचे तज्ज्ञ सांगतात. ही एक दिलासादायक बाब आहे. मात्र तरीही याबाबत कोणीही बेफिकिरी दाखवू नये. कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अतिशय गरजेचे आहे. लसीकरण हे कवच जरी असले तरी, हा विषाणू आपल्याद्वारे घरात शिरून कुटुंबीयांना धोका निर्माण करू शकतो, याचे भान प्रत्येकाने राखणे आवश्यक आहे. न पेक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

पहिल्या लाटेनंतर देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. सर्वच व्यवहार ठप्प झाले. अर्थचक्र मंदावले. अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांच्या पगारात मोठ्या प्रमाणावर कपात झाली. यात सारेच भरडले गेले. पण इलाज नव्हता. त्यामुळे आता जीविताच्या भीतीबरोबर उदरनिर्वाहाची चिंता देखील सर्वसामान्य नागरिकांना आहे. परिणामी पुन्हा लॉकडाऊन किंवा कठोर निर्बंध सध्याच्या घडीला परवडणारे नाहीत. त्यासाठीच मुंबईकरांचे लक्ष आहे ते लोकल ट्रेनकडे. दोन दिवसांपूर्वी राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी एका वृत्तवाहनीशी बोलताना महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे लोकल सेवेबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे वक्तव्य केले होते.

विशेष म्हणजे, वडेट्टीवार यांनी आतापर्यंत अनेकदा लोकल ट्रेन बंद करण्याबाबत वक्तव्य केले आहे. लोकल ट्रेन बंद करण्यात त्यांना कोणता आनंद मिळणार आहे, देव जाणे. त्यांनी लोकल ट्रेनमधून आतापर्यंत कितीसा प्रवास केला आहे? मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन किती महत्त्वाची आहे, हे ते जाणून आहेत का? गम्मत म्हणजे, लोकल सेवा बंद करण्याचे संकेत देतात आणि नंतर हा निर्णय मुख्यमंत्री घेतील, अशी पुस्ती जोडतात. मुंबईकरांच्या मनात अशी भीती निर्माण करण्याचे काय कारण आहे?

एकीकडे सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन बंद करायची आणि दुसरीकडे बस, मेट्रो, रिक्षा-टॅक्सी बिनदिक्कत सुरू ठेवायची असला प्रकार सुरू झाला. सुरुवातीला बेस्ट बसमधून प्रवास करताना युनिव्हर्सल पास काटेकोरपणे तपासला जायचा. पण आता प्रत्येकाला रोजीरोटीची भ्रांत असल्याने बसमधील गर्दीही वाढत आहे. अशा वेळी युनिव्हर्सल पास तपासणे शक्य होत नाही. रिक्षा-टॅक्सीवाल्यांनी तर त्याची मागणी करण्यास केव्हाच बंद केले आहे. लोकल सेवेबद्दल म्हणायचे झाल्यास सुरुवातीला अत्यावश्यक सेवेत असणाऱ्यांना प्रवासाची मुभा होती. त्यावेळी अशी बनावट ओळखपत्रे बनविण्याचा गोरखधंदा जोरात होता. आता युनिव्हर्सल पास बंधनकारक केला असला तरी, तोही बनावट तयार केला जात असल्याचे उघड झाले आहे. अशा अवैध उद्योगांना खतपाणी घालण्यासाठी सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल सेवा बंद करण्याचे संकेत दिले जात नाही ना? अशी शंका निर्माण होऊ शकते.

सुदैवाने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लोकल सेवा बंद करण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट केल्याने सर्वसामान्य मुंबईकरांना तूर्त हायसे वाटले आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असले तरी, कोणतीही लक्षणे नसलेल्यांची संख्या त्यात अधिक आहे. त्यामुळे तसा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी सांगितले. जीवाचा धोका असतानाही आपल्या कुटुंबीयांसाठी या मुंबईकरांना घराबाहेर पडावेच लागते. कोरोनाचा धोका आताचा आहे,

सर्वसामान्यांचा लोकलप्रवास हा पूर्वीपासून धोकादायकच ठरत आला आहे. पण आपल्यावर मायेची पाखर घालणाऱ्यांच्या सुखासाठी ते कायम धोका पत्करत आले आहेत. मग मुंबईत वारंवार झालेले बॉम्बस्फोट असोत, २६/११चा दहशतवादी हल्ला असो, २००५चा महापूर असो किंवा कोणतेही संकट असो; मुंबईकर त्यांना धीराने सामोरा गेला आहे. कोरोना काळातही सर्वसामान्य मुंबईकराने संयम दाखवला आहे. उदरनिर्वाहासाठी, आपल्या कुटुंबीयांसाठी तो नेहमीच्या लोकल गाडीची वेळ कधी चुकवत नाही. आताही त्याने आपल्या कुटुंबीयांसाठी काही गोष्टी ठरवून ठेवल्या पाहिजेत, त्यात सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. आपणा सर्वांना कोरोनासोबतच जगायचे आहे, हे वास्तव आहे. पण त्याला आपल्यावर आरूढ होऊ न देणे, हे आपल्या हातात आहे.

Recent Posts

Monsoon Trip : काही दिवसांवर येऊन ठेपला पावसाळा; ‘या’ ठिकाणी जायचा आत्ताच बेत आखा!

मुंबई : पावसाळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच आता निसर्गप्रेमींचे पावसाळी पिकनिकचे प्लॅन…

2 mins ago

Beed cash seized : बीडमध्ये पोलीस निरीक्षकाच्या घरी सापडली १ कोटींची रोकड!

९७० ग्रॅम सोने आणि ५ किलो चांदीही केली जप्त बीड : बीड शहरातील एक कोटी…

28 mins ago

Cinema Hall Shut Down : दहा दिवस चित्रपटगृह राहणार बंद!

जाणून घ्या नेमकं काय आहे कारण मुंबई : कलाविश्वाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली…

52 mins ago

Mumbai Water Shortage : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! कडाक्याच्या उन्हात पाणीटंचाईचा प्रभाव

'या' भागातील चक्क १६ तास पाणीपुरवठा खंडित मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरीय क्षेत्रांमध्ये उकाडा…

1 hour ago

Horoscope : दोन दिवसांत ‘या’ राशीत येणार राजयोग; होणार धनलाभ!

पाहा तुमची रास आहे का यात? मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, दोन दिवसांनंतर अत्यंत शुभ राजयोगाची निर्मिती…

2 hours ago

Mumbai Central Railway : प्रवाशांचा खोळंबा! मध्य रेल्वेवर पंधरा दिवसांचा ब्लॉक

काही ट्रेन्स रद्द, तर काही उशिराने, पाहा वेळापत्रक मुंबई : रेल्वेचा मेगा ब्लॉक म्हटलं की…

3 hours ago