समर्थ राऊळ महाराज
प. पू. राऊळ महाराजांबद्दल माझ्या भावाकडून खूप काही ऐकले होते. पण प्रत्यक्ष अशी भेट झाली नव्हती. सन १९७४-७५ पर्यंत मला भावाची चार-पाच पत्रे आली होती की, राऊळ महाराज मुंबईला आले आहेत. त्यांची भेट घ्या. पण महाराजांबद्दल काही विचित्र गोष्टी ऐकून मला त्यांच्या दर्शनाला जाणे नको वाटायचे. राऊळ महाराज शिव्या देतात, कधी कधी हाकलूनही लावतात. असे लोकांच्या तोंडून ऐकले होते. त्यामुळे त्यांच्याकडे जाण्यास माझे मन मागेपुढे होई. मला एक प्रकारची धास्ती वाटे; परंतु एकदा भावाची मला तार आली की, महाराज मुंबईला आहेत. तेव्हा मला काय वाटले कुणास ठाऊक. मी माझ्या मुलीला बरोबर घेऊन दादरला माझ्या बहिणीकडे आले.
कारण राऊळ महाराजांचे एकही ठिकाण मला माहीत नव्हते. माझी बहीण मला घेऊन माहीतला गेली. तिथे समजलं, आबा आत्ताच कुठे बाहेर गेले. नाराज होऊन खाली उतरलो. त्या ठिकाणी बहिणीच्या ओळखीचे एक गृहस्थ भेटले. त्यांनी बाबांची चौकशी केली. त्यांना सांगितले आत्ताच कुठे बाहेर गेले तेव्हा ते म्हणाले, ‘तुम्ही येता का?’ कोठे? तर म्हणे काशी मावशीच्या घरी जाऊ त्याप्रमाणे तेथे गेले. मला काय करायचे ते सुचेना. बाबांनी हात पुढे केला व मला बसायला सांगितले. पाया पडायलासुद्धा मला अवसर दिला नाही. मावशीला सांगितले बाबांच्या बहिणीच्या मुलाचे लाडू दे आणि त्यांच्या अंतर्ज्ञानाचा मला पहिला अनुभव मिळाला. त्यानंतर मी पिंगुळीला आले. त्यावेळी बाबा गेल्या गेल्या म्हणाले, बोबडे मुंबैक कधी जाऊया? मी म्हटले केव्हा पण जाऊ. तर बोबडे उद्या जाऊया.
दुसऱ्या दिवशी आम्ही मुंबईला आलो. आले ते हरि ओमच्या घरी गेले. असेच एक दिवस मी आजारी पडले, मला अर्धांगाचा झटका आला. त्यादिवशी दुपारी २.३० वाजता मला बाबा स्वप्नात दिसले. अण्णा होते. बाबा त्यांना म्हणाले, ‘विन्या ह्यांका जावक देव नको’ आणि मला हातावर प्रसाद दिला. मी जागी झाले. इकडे तर मला बोलता येत नव्हते. तोंड वाकडे झाले होते. लाळ गळत होती. कपडे ओले होत होते. घरात कोणी नव्हते. ६ वाजता यजमान आले, त्यानंतर मला हॉस्पिटलमध्ये नेले. बाबांनी स्वप्नात दिलेला प्रसाद मला हॉस्पिटलमध्ये मिळाला. माझा मामेभाऊ गावी गेला होता. त्याच्याकडे अण्णांनी प्रसाद पाठविला होता, असे अनेक अनुभव आहेत.