नांदेड : सध्या माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. अशोक चव्हाण कुठे चालले. गाडीने कुठे जातात, कोणाला भेटतात, यावर पाळत ठेवली जात आहे. याचा विनायक मेटे करा, यालाटी मेटेंसारखे संपवा, अशीही चर्चा सुरु आहे, असे खळबळजनक विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.
अशोक चव्हाण यांच्या नावाचे खोटे लेटरपॅड तयार केल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला आहे. याप्रकरणी अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यांच्या अधीक्षकांना भेटून तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, त्यांनी आपल्यावर अज्ञात व्यक्तीकडून पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
बोगस लेटरपॅडच्या आधारे अशोक चव्हाण मराठा समाजाच्या विरोधात आहेत, असा संभ्रम लोकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे, असेही अशोक चव्हाण म्हणाले.
हे आरोप करत असताना, अशोक चव्हाण यांनी कोणाचेही नाव घेतलेले नाही. पण संबंधित बोगस पत्र तयार करणा-यावर कारवाई झाली पाहिजे, त्यामागचा मुख्य सूत्रधार कोण आहे, हे शोधून काढले पाहिजे, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.