ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकरांना देणार जोरदार टक्कर
मुंबई : महायुतीमध्ये (Mahayuti) धाराशिव (Dharashiv) हा मतदारसंघ अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) सुटला असून या ठिकाणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आणि धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील (Archana Patil) यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. अर्चना पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.
महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाचे जे खासदार निवडून येऊ शकतात त्यामध्ये धाराशिवच्या ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांचे नाव घेतले जाते. ठाकरे गटाकडून यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकर यांच्यावरच विश्वास दाखवला गेला. त्यामुळे आता महायुती त्यांच्याविरोधात कोणता उमेदवार रिंगणात उतरवणार, याची सर्वांना उत्सुकता होती. ही उत्सुकता अखेर संपली असून महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अर्चना पाटील (Archana Patil) यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे.
अर्चना पाटील यांनी निवडणूक लढवण्यासाठी आज सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर सुनील तटकरे यांनी अर्चनाताईंची उमेदवारी जाहीर केली. आतापर्यंत महायुतीमधील तिन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांची घोषणा स्वतंत्र व्यासपीठांवर केली होती. परंतु, अर्चना पाटील यांच्या लोकसभा उमेदवारीची घोषणा हे महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित असताना होत आहे, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.