मुंबई : सुदानमधील गृहयुद्धात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन कावेरी’च्या माध्यमातून आणखी २९७ जणांची सुटका गुरुवारी करण्यात आली. त्याआधी काल बुधवारी २७८ जणांची सुटका करण्यात आली.
भारतीय हवाई दलाच्या ‘सी-१३०जे’ या लष्करी मालवाहतूक करणाऱ्या दोन विमानांमधून हे भारतीय सौदी अरेबियातील जेद्दाह येथे पोहोचले. संघर्षग्रस्त सुदानमधून अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आणि सुरक्षितपणे परत आणण्यासाठी भारताने ”ऑपरेशन कावेरी” सुरू केले आहे.
नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ५३० नागरिक सुदानमधून सुखरूपपणे बाहेर पडले आहेत. ऑपरेशन कावेरी’अंतर्गत सुटका करण्यात आलेल्या भारतीयांची ही तिसरी तुकडी आहे.
भारताने जेद्दाह येथे वाहतूक व्यवस्था उभारली आहे. सुदानमधील भारतीयांना घेऊन विमान किंवा जहाजाने या शहरात आणले जात आहे. नौदलाची ‘आयएनएस सुमेधा’ या जहाजातून काल २७८ भारतीयांच्या तुकडीला सुदानबाहेर आणण्यात आले. त्यानंतर ‘ ‘सी-१३०जे’ या मालवाहू विमान हे भारतीयांना घेण्यासाठी पोर्ट सुदानला पोहचले होते.
त्यानंतर आणखी एका विमानातून लोकांना आणले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले, की पहिल्या सी-१३०जे’ विमानातून १२१ प्रवाशांना जेद्दाहला आणले असून दुसऱ्या विमानातून १३५ जणांची सुटका करण्यात आली आहे. ‘दुसरे सी-१३० विमान जेद्दाहला सुदानहून १३५ प्रवाशांना घेऊन आले. ‘ऑपरेशन कावेरी’ वेग घेत आहे,’ असे ट्विट जयशंकर यांनी केले आहे.
सुदानमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारताने सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन हे मोहिमेची पाहणी करण्यासाठी जेद्दाहला पोहोचले आहेत. तेथून भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी हवाई दलाची लष्करी मालवाहू विमाने सज्ज आहेत.