नंदिनीनगर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५ जुनच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशमधील भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या नेतृत्वात जोरदार विरोध होत आहे. उत्तर प्रदेशमधील नंदिनी नगर येथे आयोजित सभेत महंतांनी राज ठाकरे यांना एका आठवड्यात माफी मागा, अन्यथा अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही अशी धमकी दिली आहे. बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवत स्थानिक साधूसंत आणि महंतांच्या उपस्थितीत रॅली काढली.
यावेळी बृजभूषण यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधत म्हटले आहे की, राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांवर केलेला अत्याचार आम्ही विसरणार नाही. साधूसंतांनी राज ठाकरेंना माफ केले तरच राज यांना अयोध्येत प्रवेश देण्याबद्दल विचार करू. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. साधूसंत आणि अयोध्यावासी राज ठाकरे यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी.
बृजभूषण सिंह यांनी म्हटले आहे की, आधी उत्तर भारतीयांवर अन्याय करायचा आणि नंतर अचानक राम भक्त बनायचे, हे जनतेच्याही लक्षात येत आहे. अयोध्येतील जनता राज ठाकरेंवर नाराज आहे. साधूसंतांनी राज ठाकरेंवर रोष व्यक्त केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. अयोध्येत राज ठाकरे यांना रोखण्याची तयारी सुरु झाली आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार सिंह यांनी आज त्यासाठी बैठक बोलावली. नंदिनीनगर इथे साधुसंत आणि नागरिकांसोबत त्यांनी बैठक घेतली.
राज ठाकरेंनी ५ जूनला अयोध्येत जाण्याचे जाहीर केले आहे. मनसेने या दौऱ्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. तर उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, अशी भूमिका भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी घेतली आहे.